२०१७ मध्ये १६८ जणांवर ग्रामसेवकांकडून फौजदारी गुन्हे दाखल,
अतिक्रमण प्रकरणाला वेगळे वळण
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : आडूर (ता. करवीर) येथील गायरानमध्ये अतिक्रमण करणाऱ्या १६८ ग्रामस्थांवर ग्रामसेवकांनी २०१७ मध्ये करवीर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले होते. सध्या या गुन्ह्यांची न्यायालयात सुनावणी होणार असून, पहिल्या टप्प्यात यातील ६० लोकांना २० नोव्हेंबरला न्यायालयात हजर राहण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. आडूर येथील २७ एकर गायरान जमिनीवर काही ग्रामस्थांनी अतिक्रमण केले. यानंतर राजकीय हेव्यादाव्याने अतिक्रमणाला विरोध झाला. यानंतर काही ग्रामस्थांनी उर्वरित गायरानमध्ये अतिक्रमण करून संपूर्ण गायरान हडप केले. याबाबत गटविकास अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिक्रमणाबाबत तक्रारी होऊ लागल्या. याची दखल घेऊन तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी गायरानमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. २०१७ मध्ये ग्रामसेविका गीतांजली वाईंगडे, मंडल अधिकारी सुहास घोदे व तलाठी राजाराम चौगले यांनी या गायरानमध्ये अतिक्रमण असणाऱ्या जागेचे पंचनामे केले. यात २०२ ग्रामस्थांनी अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले. यातील १६८ जणांवर करवीर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या फौजदारी गुन्ह्यांची आता सुनावणी सुरू झाली असून, कलम ४४७, ३४ अन्वये जबाब देण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी सहदिवाणी न्यायालय क. स्तर व प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्यासमोर २० नोव्हेंबरला हजर राहण्याच्या नोटिसा करवीर पोलीस ठाण्यातून देण्यात आल्या आहेत.