इचलकरंजी : शांतिनगरमध्ये राहणारी एक १८ वर्षीय तरुणी घरी कोणास काहीही न सांगता निघून गेली होती. सायबर पोलीस व गावभाग पोलिसांच्या मदतीने त्या मुलीस पुणे येथून ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या हवाली केले. याबाबत बेपत्ता असल्याची वर्दी लता विनोद पाटील यांनी गावभाग पोलीस ठाण्यात दिली होती.
१६ जुलैला इचलकरंजीमधून दुपारी बाराच्या सुमारास ती घरी काहीही न सांगता निघून गेली होती. तिच्याकडे मोबाईल नसल्याने पोलिसांना तिचा शोध घेणे आव्हान बनले होते. गावभाग पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेत सोशल मीडियाद्वारे तिच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली.
चौकशीमध्ये पुणे येथील एका मैत्रिणीच्या घरी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन तिला ताब्यात घेत नातेवाईकांच्या हवाली केले.