कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी अवलंबली जात असलेली त्रिसदस्यीय पध्दत ही संविधानाकडून सर्वसामान्यांना मिळालेले प्रतिनिधित्वाचे अधिकार अप्रत्यक्षपणे काढून घेण्याचा प्रकार आहे, अशा शब्दात आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी टीका केली आहे.
या नव्या पध्दतीमुळे छोटे पक्ष व सर्वसामान्य कार्यकर्ते या निवडणुकीमधून बाहेर फेकले जाणार असून हा प्रस्थापित राजकीय पक्षांचा कट आहे, असा आराेप देसाई यांनी केला आहे.
राज्य सरकारचा हा निर्णय तर्कसंगत वाटत नाही. राजकीय हितसंबंध जपण्यासाठी घेतलेला व व्यवहारात पूर्वी भाजपने केलेल्या चौसदस्य रचने प्रमाणेच स्थानिक नागरिकांना ‘आपला कुणीच वाली नाही’ ही भावना निर्माण करणारा ठरू शकतो. महाविकास आघाडीने या पूर्वी एक वॉर्डाचा निर्णय का घेतला? मुंबईला वेगळा निकष का? यामुळे राजकीय हितसंबंधातून हे निर्णय घेतले जाणे लोकशाही व्यवस्थेसाठी निश्चितच चांगले नाही, असे देसाई यांनी म्हटले आहे.
या प्रकारच्या प्रभाग पद्धतीने छोट्या पक्षांच्या, अपक्ष, सामान्य उमेदवारांना भौगोलिक आवाक्यामुळे निवडणुका लढवणे अवघड जाणार आहे. साधने जास्त खर्ची पडत असल्यामुळे निवडणुका फक्त पैश्यावाल्या लोकांकडूनच लढल्या जातील. एका प्रभागात तीन नगरसेवक झाल्याने प्रभागातील कामांना, अडचणींना जबाबदार कोणाला धरायचे याबद्दल साशंकता निर्माण होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.