कोल्हापूर : महापालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार असल्याचे माजी मंत्री व समन्वय समितीचे अध्यक्ष पतंगराव कदम यांनी रविवारी येथे जाहीर केले. इच्छुक उमेदवारांनी काँग्रेस कमिटी कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकीसाठी नेमलेल्या समन्वय समिती सदस्यांची बैठक रविवारी दुपारी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या राजारामपुरी येथील निवासस्थानी पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कदम बोलत होते.पतंगराव कदम म्हणाले, गेल्या महापालिका निवडणुकीसाठी समन्वय समितीचा अध्यक्ष मीच होतो. यावेळीही आपल्याकडे जबाबदारी आहे. त्यानुसार आपण या ठिकाणी आलो आहे. गतनिवडणुका आम्ही ताकदीने लढलो; परंतु आमचे काही निर्णय चुकले. सक्षम व निवडून येणाऱ्या उमेदवारांना डावलल्याने त्याचा फटका बसला, असे १२ उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले. यावेळी अशी चूक होणार नाही. काँग्रेसमधील गटा-तटांचा विचार न करता, तसेच बारीक-सारीक कांगोरे बाजूला ठेवून सक्षम आणि निवडून येणाऱ्या उमेदवारालाच तिकीट दिले जाईल. यासाठी सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन, एकत्र बसून निर्णय घेतले जातील. या संदर्भातील बैठक आता महापालिका आरक्षण व प्रभाग रचना झाल्यावरच होईल. पक्ष सध्याच्या घडीला स्वबळावरच लढणार आहे. निवडणुकीवेळी सोबत कोण येईल ते नंतर पाहू. आतापर्यंत तरी कोणीही आघाडी करण्यासंदर्भात विचारणा केलेली नाही.माजी मंत्री सतेज पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांच्या भूमिकेविषयी विचारल्यावर ते म्हणाले, पाटील व महाडिक यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसमोर काँग्रेसकडूनच निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते कोणती वेगळी भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही. सतेज पाटील-महाडिक यांच्या वादामुळे निश्चितच पक्षाचे नुकसान झाले हे नाकारून चालणार नाही. हा वाद मिटविण्यासाठी आपला प्रयत्न यापूर्वीही होता आणि आताही राहील. आपापसांतील मतभेद व गट-तट सोडले तर काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यात बळकट आहे.गोंदिया येथील भाजप-काँग्रेस युतीबाबत छेडले असता ते म्हणाले, या ठिकाणी काँग्रेसचा एकच आमदार असून, उर्वरित आमदार, खासदार हे भाजपचे आहेत. त्यामुळे ही युती झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा हा जिल्हा असल्याने याबाबत चर्चा होत आहे; परंतु काँग्रेस पक्षाने स्थानिक आमदार गोपाळ अगरवाल यांना नोटीस काढली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी ही सर्वच ठिकाणी व्हावी, ही आमची भूमिका आहे. ही आघाडी काळाची गरज असून, ‘आघाडी धर्म’ पाळावा लागेल. यासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच होईल.यावेळी समिती सदस्य व माजी मंत्री रमेश बागवे, माजी खासदार जयवंतराव आवळे, सत्यजित देशमुख, प्रकाशराव सातपुते, महापौर वैशाली डकरे, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, ‘गोकुळ’ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, माजी आमदार बजरंग देसाई, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नारायण राणेंना ‘त्या’बाबत विचारूकॉँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे ‘मॅनेज’ असल्याची टीका कॉँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली होती. याविषयी विचारल्यावर राणेंना काय अनुभव आला? विरोधी पक्षनेते कसे ‘मॅनेज’ आहेत, हे त्यांना प्रत्यक्ष भेटून नक्की विचारू. प्रदेशाध्यक्षांनी ज्येष्ठ नेत्यांची १५ जणांची समिती नेमली आहे. त्याचे आम्ही दोघे सदस्य असून, या बैठकीत त्याबाबत चर्चाही होईल, असे पतंगराव कदम यांनी सांगितले.सतेज पाटील परदेशातजिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी प्रास्ताविकातच माजी मंत्री सतेज पाटील हे परदेशात असल्याने या ठिकाणी आले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच आमदार महाडिक हे काही वेळातच येतील, असे सांगून त्यांच्या गैरहजेरीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
काँग्रेस स्वबळावर लढणार
By admin | Updated: July 26, 2015 23:55 IST