कोल्हापूर : फळे व भाजीपाला नियमनमुक्तीला विरोध करणाऱ्या व्यापारी व अडत्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन सोमवारी बाजार समितीच्या दारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले. नियमनमुक्तीची काटेकोर अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. शेतीमाल नियमनमुक्त करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेली अनेक वर्षे करत होती. राज्य सरकारने हा निर्णय घेतला पण त्यामध्ये खोच मारली आहे. बाजार समित्यांच्या बाहेर विक्री करताना शेतकऱ्यांना सहाय्यक निबंधक अथवा जिल्हा उपनिबंधकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. या निर्णयामुळे फळे व भाजीपाला १०० टक्के नियंत्रणमुक्त होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर विक्री करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी केली. आतापर्यंत व्यापारी व बाजार समित्यांनी आमचे शोषन केले आहे. त्यातून सुटका होताना त्याला व्यापारी, अडत्यांनी विरोध केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, अजित पोवार, प्रमोद कदम, जनार्दन पाटील, संजय चौगले, आण्णाप्पा चौगले, पांडुरंग शिंदे, भीमराव गोनुगडे, बाबासो पाटील, साताप्पा पाटील, सत्त्वशील जाधव, एम. के. नाळे आदी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे ‘स्वाभिमानी’कडून दहन
By admin | Updated: July 5, 2016 00:03 IST