लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी भारतीय दलित महासंघातर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
डाॅ. बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी प्रत्येक गावांत विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून विश्वरत्नांच्या परिवर्तनवादी विचारांचा जागर केला जातो. त्यामुळे या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये. याकरीता रविवारी (दि. ६) दिवशी जिल्ह्यात संपूर्ण दिवस ही दुकाने बंद करावीत, अशी मागणी जिल्हाधिकारी देसाई यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी महासंघाचे राज्य प्रभारी महेश हळुकुंदे, प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष नारायण चौगुले, आकाश कांबळे, सचिन चौगुले, सचिन सूर्यवंशी, सागर घोलप, श्रीनिवास खुडे, रमेश भोसले, अमेय कोळी आदी उपस्थित होते.