कोल्हापूर : येथील गीता परिवाराच्यावतीने स्वच्छ ताट अभियान सुरू करण्यात आले आहे. जेवणावेळी ताटामध्ये अन्न टाकून ते वाया घालवू नये याची सवय लहानपणापासून लागावी यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. वृषाली सुधीर खोत यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे.
अनेकदा भूकेपेक्षा जास्त अन्न ताटामध्ये घेतले जाते. परंतु ते खाल्ले जात नाही आणि मग अन्नाची नासाडी होते. यामुळे अप्रत्यक्षरित्या आर्थिक नुकसान तर होतेच परंतु शेतकऱ्यांपासून ते स्वयंपाक करणाऱ्या महिलेच्या कष्टाचाही त्यात अवमान होतो. म्हणूनच अन्न न टाकण्याची सवय लहानपणापासून लागावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे वृषाली खोत यांनी सांगितले. यासाठी व्हॉटसॲप ग्रुपही तयार करण्यात आला आहे. याद्वारे मुलांना मार्गदर्शन करण्यात येते. यासाठी भूके एवढेच अन्न ताटात वाढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.