संदीप बावचे- शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर आघाड्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यात ७४ जागा बिनविरोध झाल्या असून, आता ३२ ग्रामपंचायतींसाठी लढत होणार आहे. एकूण ग्रामपंचायत सदस्यांच्या ३५१ जागांसाठी ९४१ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वांचे भवितव्य आता मतदारांच्या हाती आहे. दरम्यान, बुहतांशी ठिकाणी सत्ताधारी व विरोधी गटाकडून प्रचाराचा नारळ फुटला असून, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्याने गावातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. पैकी बुबनाळ ग्रामस्थांनी इतिहास घडविताना संपूर्ण अकरा जागांवरती महिलांना बिनविरोध निवडून आणून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे, तर कोथळी, शिरढोण, शेडशाळ, जुने दानवाड व मजरेवाडी येथे बहुतांशी जागा बिनविरोध झाल्या. मात्र, संपूर्ण जागा बिनविरोध करण्यात नेत्यांना अपयश आले. काही गावांत निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. जेथे बिनविरोध निवडणुका झाल्या त्याठिकाणी अर्ज माघारीसाठी गट नेत्यांना विनवणी करावी लागली. गावातील इतर संस्थांवर संधी देण्याचे आश्वासन देण्याबरोबरच काही उमेदवारांनी यासाठी आर्थिक उलाढालही घडवून आणली. तालुक्यात ३२ ग्रामपंचायतींच्या ३५१ जागांसाठी ९४१ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. तालुक्यात राजकीय गट-तट मोठ्या संख्येने असला, तरी काही गटांनी व उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार तडजोडी घडवून आणल्या. काही गावांत सत्तेसाठी जातीचाही आधार घेतला जात आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर विजयासाठी सत्ताधारी व विरोधी गटांकडून हालचालींना सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढती होणार आहेत. विविध आघाड्यांकडून प्रचाराचा नारळ फोडला जात असून, एकमेकांची उणीदुणी काढण्यात धन्यता मानली जात आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने गावातील राजकीय वातावरण आता हळूहळू तापू लागले आहे. एकेका मतासाठी आतापासूनच व्यूहरचना आखली जात असून, नातीगोती आणि पै-पाहुण्यांचाही आवश्यकतेनुसार उपयोग करून घेतला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या यशावरच विविध पक्षांच्या नेत्यांची ताकद समजणार असल्याने सर्वच नेतेमंडळींकडून आपआपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याबाबत सूचना केली जात आहे. विधानसभेचे पडसाद उमटणारविधानसभा निवडणुकीतील पडसाद काही गावांत हमखास उमटणार आहेत. गोकुळ, जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीनंतर तालुक्यात जातीय समीकरणाने पुन्हा जोर धरला आहे. पक्षापेक्षा गटा-तटांच्या निवडणुका होत असल्या, तरी विधानसभा निवडणुकीत पेरलेले राजकारण ग्रामपंचायत निवडणुकीत उगवणार, असेच चित्र सध्या तरी दिसत आहे.
आरोपांच्या फैरी झडू लागल्या
By admin | Updated: July 17, 2015 23:02 IST