कोल्हापूर : भाजपच्या सत्तेच्या काळातील तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फक्त मला अडकवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची कलम ८८ नुसार चौकशी लावली होती. त्यास आपण उच्च न्यायालयातून स्थगिती आणली होती. परंतु हा कुटिल डाव अयशस्वी झाला. अखेर सत्य उजेडात आले असून विजय नेहमी सत्याचाच होतो, अशी प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.
मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या चौकशीसाठी माजी न्यायाधीशांची नेमणूक केली. त्यामध्ये हेच सिद्ध झाले की, राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने बँकेचे काहीही नुकसान केलेले नाही. उलटा बँकेला फायदा झाला आहे. विनाकारण राजकीय द्वेषभावनेतून अडकवण्याचा प्रयत्न केला होता. राज्य बँकेच्या एकाही बैठकीला उपस्थित नसतानाही राजकीय द्वेषातून मला जाणीवपूर्वक गुंतवले होते. ज्यावेळी या कारवाईसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, पांडुरंग फुंडकर, शेकापचे जयंत पाटील आदी नेते चंद्रकांत पाटील यांना भेटायला गेले, त्यावेळी त्यांनी ही कारवाई फक्त हसन मुश्रीफ यांना अडकविण्यासाठी केली असल्याचे धडधडीतपणे सांगून टाकले होते.