कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने महागात पडेल अशी भाषा न वापरता सोमय्या यांना समजावून सांगावे, असे आवाहन कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने बुधवारी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, निवडणुकीपुरते केवळ पंधरा दिवस राजकारण करून पक्षभेद आणि जातिपातीच्या पलीकडे जाऊन काम करणारे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यावर बेछूट आरोप करत, चिथावणीखोर भाषा वापरून सोमय्या यांनी कोल्हापूरच्या जनतेला डिवचून शांतता बिघडवू नये. कायदा सर्वांना समान आहे. कायदेशीर तक्रारी करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. त्याप्रमाणे सोमय्या यांनी रीतसर तक्रारी जरूर कराव्यात; पण स्टंटबाजी करून संस्थेला बिघडविण्याचे काम करू नये. लॉकडाऊनमुळे जनता अगोदरच त्रस्त झाली आहे. त्यातच बाहेरून येऊन जिल्ह्यामध्ये चिथावणीखोर भाषा वापरू नये. कोल्हापूरचे वातावरण गढूळ होईल असे वर्तन करू नये. अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, ॲड. रणजित गावडे, माणिक मंडलिक, दादा लाड, बाबासाहेब देवकर, चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, अजित सासने, महेश जाधव, कादर मलबारी, राजेश वरक, बाबा जामदार, मदन चोडणकर, फत्तेसिंह सावंत यांनी हे आवाहन केले आहे.
चौकट
...तर मुंबईत घरासमोर आंदोलन
जर याच पद्धतीने सोमय्या कोल्हापुरात येऊन शांतता बिघडवणार असतील, तर मुंबईत त्यांच्या घरासमोर येऊन आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही कृती समितीने दिला आहे. समितीने मुश्रीफ यांना पाठबळ देतानाच चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला आहे.