संदीप बावचे, शिरोळ : शिरोळ मतदारसंघ कॉँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले मताधिक्य यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीला महायुतीचे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. कॉँग्रेसकडून आमदार सा. रे. पाटील निवडणुकीत उतरणार का? हा महत्त्वाचा मुद्दा असून, विधानसभेची ही निवडणूक निश्चितच तालुक्यातील राजकीय दिशा बदलणारी ठरणार आहे. या मतदारसंघात आठ जिल्हा परिषद, तर सोळा पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत. ५३ गावे व दोन शहरांचा तालुक्यात समावेश असून, राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून जिल्ह्यात तालुक्याची ओळख आहे. गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसचे आमदार सा. रे. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील व शिवसेनेचे राजू कुरडे रिंगणात होते, पण खरी लढत स्वाभिमानी व कॉँग्रेस पक्षातच झाली. यापूर्वी दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले ज्येष्ठ नेते सा. रे. पाटील १६ हजार ४४६ मतांनी विजयी झाले. यात त्यांना राष्ट्रवादी, जनसुराज्य व मित्रपक्षांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकींमध्ये स्वाभिमानी संघटनेने यश मिळविले. पंचायत समितीवर स्वाभिमानीने सत्ता मिळविली, तर जयसिंगपूर बाजार समिती व जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वाभिमानीला खाते उघडता आले नाही. ऊस आंदोलनाच्या माध्यमातून स्वाभिमानीने आपली चळवळ कायम ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तालुक्यातील मताधिक्यातही वाढ झाल्याने विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. येणारी विधानसभा निवडणूक महायुतीच्या छताखाली लढविल्या जाणार असल्याने ‘स्वाभिमानी’चे बळ आणखीन वाढणार आहे. गेल्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराने २८ हजार ८४ मते घेतली होती, ही मते घेणारे कुरडे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तालुक्यातून २३ हजारांचे मताधिक्य शेट्टी यांना मिळाल्यामुळे तगडा उमेदवार महायुतीच्या उमेदवाराविरोधात कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला उभा करावा लागणार आहे. स्वाभिमानीकडून जिल्हा उपाध्यक्ष उल्हास पाटील, जि. प.चे बांधकाम सभापती सावकर मादनाईक यांची नावे चर्चेत आहेत. कॉँग्रेस व राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणुका लढल्यास राष्ट्रवादीकडून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे नाव घोषित होऊ शकते. राष्ट्रवादीकडून विठ्ठलराव नाईक निंबाळकर, दलितमित्र अशोकराव माने दोघे इच्छुक आहेत. कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील गटबाजीचा फायदा आजपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उठविला आहे. लोकसभा निवडणुकीत मात्र हे सर्वजण एकत्र आले होते. ही गटबाजी संपुष्टात येणार की पुन्हा विधानसभेला गटबाजीचे दर्शन घडणार यावरही बरेच काही अवलंबून आहे. पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण तालुक्यात आतापर्यंत दिसून आले आहे. लोकसभा निकालानंतरही कॉँग्रेस-राष्ट्रवादी अद्याप झोपलेली असल्यासारखे दिसत आहे. लोकसभेतील मताधिक्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. विधानसभेतही महायुती भक्कमपणे निवडणूक रिंगणात उतरली तर विजय अवघड नाही; परंतु जातीय समीकरणावरच ही निवडणूक होईल, असेच संकेत आहेत.
बालेकिल्ला टिकविण्याचे कॉँग्रेससमोर आव्हान
By admin | Updated: June 14, 2014 01:25 IST