कोडोली : पन्हाळा ,गगनबावडा व वैभववाडी मतदारसंघाचे माजी आमदार व शहापूर (ता. पन्हाळा) येथील शाहू कुक्कटपालन संस्थेचे संस्थापक यशवंत एकनाथ पाटील यांच्या अर्धपुतळ्याचा अनावरण सोहळा आज, गुरुवारी सायंकाळी ५ वाजता शहापूर येथे शाहू कुक्कुटपालन संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार डॉ. विनय कोरे, गोकुळचे संचालक अरुण नरके, माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, राजारामबापू साखर कारखाना इस्लामपूरचे चेअरमन पी. आर. पाटील, माजी शिक्षण सभापती अमरसिंह पाटील, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याचे संस्थेचे चेअरमन लक्ष्मणराव शंकरराव कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यशवंत पाटील यांनी या मतदारसंघाचे सलग २५ वर्षे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. हा परिसर डोंगराळ व दुर्गम असल्याने दळणवळण साधनांचा तसेच शैक्षणिक व औद्योगिकरणाचा अभाव होता. त्यांनी मतदारसंघाचा सर्वागीण विकास साधण्याकरिता मजबूत असे रस्ते करण्याबरोबरच आरोग्य, शैक्षणिक व औद्योगीकरणावर भर दिला. ग्रामीण भागात शेतीला पूरक असणाऱ्या दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दुग्ध संस्था व सेवा सोसायटीची स्थापना करून कार्यकर्त्यांना दिल्या. आरोग्याच्या सोयी-सुविधा म्हणून सरकारी रुग्णालय सुरू केले. शहापूर येथील फोंडया माळावर ‘विना सहकार नाही उध्दार’ या ब्रीदवाक्याची प्रेरणा घेऊन भव्य अशा शाहू कुक्कुटपालन व अंडी व्यावसायिक संस्थेची १९८८ मध्ये स्थापना केली. कोरोना, बर्ड फ्लू यासारखी अनेक संकटे आली तरीही ही संस्था स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभी आहे. संस्थेत वार्षिक ३.२५ कोटींच्या अंड्यांचे उत्पादन होत आहे. कुक्कुटपालन व्यवसायात राज्यातील ग्रामीण संस्थेत सहकारातील सोनेरी मुकुट या संस्थेने आपल्या कर्तृत्वाने परिधान केला आहे. सुरुवातीच्या काळात मोजकेच सभासद व कर्मचारी यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या संस्थेत आज प्रतिदिन सरासरी ९० हजारहून अधिक अंडी उत्पादन होत आहे. सध्या संस्थेत १ लाख ५० हजार इतकी पक्ष्यांची संख्या आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल १९ कोटी ३० लाख आहे. १६ शेडच्या माध्यमातून दोन वेळा संस्थेचा विस्तार झाला आहे. संस्थेचा स्वत:चा ३० टन क्षमतेचा पशुखाद्य कारखाना आहे. संस्थेचे माजी चेअरमन बाबासोा पाटील यांनी पंचवीस वर्षे चेअरमन पदाची धुरा सांभाळून संस्थेस नावलौकिक मिळवून दिला. २००६ मध्ये आलेला बर्ड फ्लू संसर्ग, २०१८ ला आलेला महापूर व २o२० ला कोरोना या संसर्गामुळे हा व्यवसाय अडचणीत आला तरीही ही संस्था सक्षमपणे चालू राहिल्याने संंस्थेने पश्चिम महाराष्ट्रात कुक्कुटपालन व्यवसायात नावलौकिक मिळविला आहे. पक्ष्यांना खाद्य घालताना वाया जाऊ नये म्हणून ऑटोमोशन या यंत्राद्वारे खाद्य पुरविले आहे. तसेच पक्ष्यांच्या आरोग्यासाठी आधुनिक गॅस वुडर ही यंत्रणा सुरू केली आहे.
या संस्थेकडे ७० कर्मचारी आहेत. संस्थेचे विद्यमान चेअरमन लक्ष्मणराव शंकरराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी या संस्थेच्या उत्कर्षाला हातभार लावला आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अंडी विक्री केली जात असतात. या संस्थेचे शहापूर व कोडोली येथे अंडी व पक्षी विक्री केंद्रे उभारली आहेत. माजी जिल्हा परिषद शिक्षण व अर्थसभापती अमरसिंह पाटील, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील , व्हा. चेअरमन निवृत्ती काईंगडे , सेक्रेटरी शिवाजी निंबाळकर यांच्यासह सर्व संचालकांचे मार्गदर्शन या संस्थेस लाभत आहे.