सातारा : ‘बंधू माझा दूरदेशी...त्याची आठवण जीवाशी!,’ असं प्राक्तन नशिबी आलेल्या बहिणींनी रक्षाबंधनासाठी भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी पोस्टात गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.बहीण आणि भाऊ यांच्यातील अतूट नात्याला आणखी घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण! या सणाला भावाच्या मनगटावर राखी बांधून पाठीशी ठाम उभे राहण्याचे अभिवचन घेण्याची ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. जग वेगाने बदलले तरीही ही परंपरा कायम आहे.नोकरी, व्यवसायानिमित्त अनेकांना आपल्या राहत्या घरापासून दूर राहावे लागते. या धावपळीत आपल्या जीवलगांची भेट होत नाही. रक्षाबंधनातही अनेकांना सुटी मिळत नाही. तसेच बहिणींनाही लांब राहणाऱ्या भावापर्यंत पोहोचता येत नाही. संरक्षण दलात काम करणारे कर्मचारी, देशभरात कुठेही बदली होणारे वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी यांना नेहमीच आपल्या जीवलगांपासून दूर राहावे लागते.पोस्ट खाते त्यांना आपल्या नातेवाइकांशी नेहमीच जोडून ठेवते. त्यामुळे रक्षाबंधनादिवशी बहिणी या पोस्टाचाच आधार घेतात. पोवई नाक्यावरील पोस्ट कार्यालयात राख्या पाठविण्यासाठी बहिणींनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
बंधू माझा दूरदेशी! रक्षाबंधन :
By admin | Updated: August 7, 2014 00:15 IST