कोल्हापूर : रस्त्यावर धक्का लागला, गाडीची टक्कर झाली, असा विनाकारण वाद निर्माण करून लूट करण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. कोल्हापूर शहर परिसरातही काही घटना घडल्याची ताजी उदाहरणे आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक होत असलेल्या अशा वादाबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचा तसेच अशा लूटमारीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीकडून आपले सोन्याचे दागिने, मौल्यवान मोबाईल, रोकड अशा वस्तूंची विशेष काळजी घेतली जाते. मोठ्या प्रमाणात दागिने, रोकड घरात असेल, तर बाहेर जाताना घराला कुलूप लावले जाते. चोरी होऊ नये म्हणून शक्य असेल तेवढी काळजी घेण्याचा प्रयत्न होतो. परंतु अलीकडे चोरसुध्दा हुशार झाले आहेत. घरफोडी, चोरी करत बसण्यापेक्षा कमी कष्टात जाता जाता हात मारत येतो का, याचा सतत विचार करत असतात. त्यातून मग चोरांच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या समोर येऊ लागल्या आहेत.
त्यापैकीच एक रस्त्यात लुटण्याचा प्रकार होय. विशेषत: कमी गर्दीच्या ठिकाणी किंवा निर्जनस्थळी एकाद्या व्यक्तीच्या वाहनाला मुद्दाम धडक मारायची. गाडीचे नुकसान झाले म्हणून त्याच्याशी वाद घालयाचा. वाद घालता घालता समोरच्या व्यक्तीला चाकूसारख्या हत्याराचा धाक दाखवून त्याच्याकडील किमती ऐवज काढून घेऊन पलायन करायचे, अशा घटना अलीकडे घडायला लागल्या आहेत. कोल्हापुरात हे प्रमाण कमी असले, तरी अशा घटना घडू शकतात. म्हणूनच विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
कोल्हापुरात तिघा जणांची लूट -
कोल्हापुरात अलीकडील काळात अशा दोन घटनांत तिघांची लूट झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. जानेवारी ते सप्टेंबर अशा गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्यात अशा लुटीच्या ७८ घटना घडल्या आहेत.
पहिली घटना २४ ऑगस्ट रोजी कसबा बावडा येथे घडली आहे. चारचाकी वाहनातून आलेल्या काही व्यक्तींनी स्काॅर्पिओमधून येऊन महापालिकेच्या डंपरला धडक मारून त्यांच्याशी वाद घातला. नंतर डंपर चालकासह दोघांना मारहाण करून त्यांच्याजवळील किमती ऐवज, मोबाईल लुटला होता. याप्रकरणी पोलिसांनी इंदापूरच्या पाचजणांच्या टोळीला अटक केली.
दुसरी घटना दि. ९ जुलैरोजी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडली आहे. सिगारेट देण्याचे आमिष दाखवून इचलकरंजीच्या प्रवाशास पंचगंगेच्या घाटावर नेऊन त्याच्याजवळील रोख रक्कम आणि दागिने लुटले गेले.
असे तुमच्याही बाबतीत घडू शकते -
‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे एक घटना घडल्यानंतर बाकीच्यांनी शहाणे होणे अपेक्षित असते. परंतु वारंवार अशा घटना घडत असताना, वृत्तपत्रातून बातम्या येत असतानासुध्दा नागरिक खबरदारी घेत नाहीत आणि मग लूटमारीला बळी पडतात. अशा घटना तुमच्याबाबतीतही घडू शकतात. निर्जनस्थळी तरी कोणी थांबविण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नये.
- काय काळजी घ्याल ?
१. आपल्याजवळील मौल्यवान वस्तूंचे विनाकारण प्रदर्शन करू नये.
२. ज्या काही वस्तू जवळ असतील त्याचा नीटपणे सांभाळ करावा.
३. अशी घटना घडलीच तर चोरांच्या गाडीचे नंबर टिपून घ्यावेत.
४. संबंधित चोरांचे चेहरे नीट न्याहाळावेत, त्याचे वर्णन करता आले पाहिजे.
५. घटना घडल्यानंतर तात्काळ नियंत्रण कक्षाला फोन करून कल्पना द्यावी.
आर. आर. पाटील, पोलीस उपअधीक्षक
करवीर विभाग, कोल्हापूर.
-कोल्हापुरात घडलेल्या घटना -
जानेवारी ते मे - ५३
जून - १०
जुलै - ७
ऑगस्ट - ८