बेळगाव : केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत आम्ही एका व्यक्तीला पाच किलो पौष्टिक धान्य वाटप करीत आहोत. दक्षिणेतील १२ जिल्ह्यांमध्ये ३ किलो नाचणी, २ किलो तांदूळ आणि ३ किलो मका वितरित केला जाणार आहे; तर उत्तर भागातील १२ जिल्ह्यांमध्ये ३ किलो ज्वारी आणि २ किलो नाचणी वाटप केली जाईल, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. बुधवारी, मंत्री उमेश कत्ती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना तांदूळ वाटप करताना २ किलो तांदूळ कमी देण्यात यावेत, असे विधान उमेश कत्ती यांनी करताच त्यांच्यावर जनतेतून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. सोशल साईटवर आणि विरोधी पक्षाने या विधानावर जोरदार प्रतिक्रिया नोंदवताच उमेश कत्ती यांनी माफी मागितली.
केंद्र सरकारने अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार, दारिद्र्यरेषेखालील लोकांना पाच किलो धान्य आणि त्याचप्रमाणे अंत्योदय रेशनकार्ड असणाऱ्यांना ३५ किलो अन्नधान्य दिले जाणार आहे. राज्यांच्या प्रोत्साहनासाठी आणि सबलीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या आधारभूत किमतीच्या अंतर्गत, नाचणी , मका समर्थन मूल्य योजनेखाली खरेदी करून, राज्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार जनतेला पौष्टिक आहार देण्यात येणार आहे. सध्या ज्वारीसाठी २६४० रुपये समर्थन मूल्य देण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांनी ३५०० ते ४५०० रुपयांची मागणी केली आहे . कृषी आयोगाच्या अहवालात तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री या नात्याने मी केंद्र सरकारकडे ज्वारीसाठी ३५०० ते ४५०० आधारभूत मूल्य देण्याची मागणी करीत असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, एका व्यक्तीला किती अन्नधान्याची आवश्यकता आहे त्यानुसार धान्य वितरणासंबंधी कायदा करण्यात आला आहे. सध्या ५ किलो धान्याचे वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार २ किलो तांदूळ कमी करण्याबाबत आपण वक्तव्य केले असून, या वक्तव्याचा कोणीही विपर्यास करून राजकारण करू नये. केंद्र सरकारने अन्न सुरक्षा कायदा लागू केला आहे. अन्नसुरक्षा कायदा काँग्रेस राजवटीत अस्तित्वात आला असून काँग्रेसचाच कायदा आम्ही पुढे नेत असल्याचे उमेश कत्ती म्हणाले.
उमेश कत्ती यांनी केलेल्या विधानानंतर जनतेमध्ये तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. काँग्रेस राज्य अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उमेश कत्ती यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, हा सारा प्रकार आणि होणारा विरोध पाहून उमेश कत्ती यांनी साऱ्यांची माफी मागितली. शिवाय डीकेशींना राजीनाम्याबाबत खडे बोल सुनावले. माझा राजीनामा मागणारे डीकेशी आहेत तरी कोण? डीकेशींनी काँग्रेसची शवयात्रा काढावी आणि सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानासमोर ती पुरावी, अशी प्रतिक्रियाही उमेश कत्ती यांनी दिली.