कोल्हापूर : चाळीस वर्षे पडून असलेली जागा, ड्रेनेजच्या पाण्याने झालेली दलदल, शेणी, खरमातीची मुबलकता यांमुळे शहराच्या मध्यवस्तीत असूनही दुर्लक्षित राहिलेल्या दीड एकर जागेत आज, गुरुवारी राजारामपुरीतील कोरगावकर व सन्मित्र हौसिंंग सोसायटीच्या प्रयत्नांतून सुंदर बगीचा फुलला आहे.नेहमी प्रत्येक गोष्ट महापालिकेने करावी, यासाठी आंदोलने सुरू असतात; पण, लोकांनीच आपल्या भागाच्या विकासासाठी प्रयत्न केला तर किती मोठे काम करता येते, याचा आदर्श राजारामपुरीतील या दोन सोसायट्यांनी आपल्या कामातून कोल्हापूरकरांना घालून दिला आहे. कोरगावकर सोसायटीतील मानसिंग चव्हाण व जयंत कुलकर्णी यांच्या कल्पक विचारातून व भागातील नागरिकांच्या प्रयत्नातून हा सुंदर बगीचा साकारला आहे. या बागेत असंख्य दुर्मीळ वनस्पती लावण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने गोरखचिंच, रक्तचंदन, बेल, तुळस, आपटा, कोकम, पळस, कदंब, कैलासपती अशा नानाविध वृक्षांचा तसेच फुलझाडांचा समावेश आहे. बागेला मजबूत कंपौंड वॉल, वॉकिंग ट्रॅक, वयोवृद्धांना विश्रांतीसाठी बाकांची सोय करण्यात आली आहे. महिलांसाठी प्राणायामाचे प्रशिक्षणही येथे दिले जाते.वृक्षांना पाण्याचा तुटवडा होऊ नये यासाठी कूपनलिका मारली आहे. टॉयलेट, वॉचमनसाठी स्वतंत्र केबिन, साफसफाईची व्यवस्था, अशा प्रकारे बागेची देखभाल दोन्ही सोसायट्यांकडून केली जाते. या दुर्मीळ वृक्षांच्या संवर्धनासाठी अनेकांनी सढळ हातांनी मदत केली आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आमदार निधीमधून निधी दिला आहे. तसेच भागातील नगरसेवक राजू पसारे यांनीही मदत केली आहे. ‘कोरगावकर’चे चेअरमन व कार्यकारी संचालक, ‘सन्मित्र’चे चेअरमन व कार्यकारी संचालक या सर्वांनी वेळोवेळी निधी मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला आहे. सोसायटीचे सभासद, भागातील ज्ञात-अज्ञातांनी या कार्यात आपला खारीचा वाटा उचलून सढळ हस्ते मदत केल्याने सहभागातून हा देखणा बगीचा साकारला आहे. आमदार राजेश क्षीरसागर व महापालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी बागेला भेट देऊन सोसायटीच्या सभासदांचे कौतुक केले. त्याच्या देखभालीसाठी व इतर सहकार्यासाठी सदैव तत्पर राहू, अशी त्यांनी ग्वाही दिली. याबाबतचे पत्रक मानसिंग चव्हाण व जयंत कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिले आहे. (प्रतिनिधी)
लोकसहभागातून साकारला दुर्मीळ वृक्षांचा सुंदर बगीचा
By admin | Updated: January 9, 2015 00:24 IST