कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकूळ) शुक्रवारी उत्पादकांना जाहीर केलेली दरवाढ म्हणजे वचनपूर्ती नव्हे, ती नियमित दरवाढ असल्याचे विरोधी आघाडीच्या संचालकांनी म्हटले आहे. त्यासंबंधीचे पत्रक त्यांनी रविवारी कुणाचेही नाव न घालता प्रसिध्दीस दिले. आम्ही सत्ताधारी असतो तरी ही दरवाढ केलीच असती, त्यामुळे पाट थोपटून घेण्याची गरज नसल्याचा टोलाही लगावला आहे.
पत्रकात म्हटले आहे, सत्तारुढ नेत्यांनी अविर्भावातून असे भासवण्याचा प्रयत्न केला की जणू ही दरवाढ देऊन वचनपूर्ती केली आहे. पण जे समोर दाखवलं जातंय त्यापेक्षा सत्य काहीतरी वेगळेच आहे. ठरावीक कालांतराने दूध खरेदी-विक्री दरामध्ये वाढ होतच असते. आताही पुणे-मुंबईमधील दूध विक्रीच्या दरात वाढ केल्यानंतरच इथे खरेदी दरात वाढ केली आहे. त्यातही यंदा केलेल्या नवीन विक्री दरवाढीनुसार पुणे-मुंबई येथील विक्रीमधून संघाला जी रक्कम मिळणार आहे व त्यातून दूध उत्पादकाला खरेदीसाठी जी वाढीव रक्कम देण्यात येणार आहे यामध्येही तफावत आहे. वाढलेल्या दरानुसार मिळणाऱ्या रकमेचा पूर्ण वाटा दूध उत्पादकाला न देण्याचा घाट कशासाठी घातला जातोय, हासुद्धा प्रश्न आहेच. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी पाठ थोपटून घेण्याची गरज नाही. फरक एवढाच आहे की, आमची सत्ता होती तेव्हा आम्ही अशा दरवाढीचे भांडवल केले नाही.
४ रुपये कधी देणार
निवडणुकीवेळी जाहीर सत्तारूढ नेते सभेत म्हणाले होते की, ‘ग्राहकांवर बोजा न टाकता आम्ही दूध खरेदीमध्ये ४ रुपये दरवाढ देऊन दाखवतो.’ त्यामुळे दूध उत्पादकांच्या वतीने आमची इतकीच मागणी आहे की नियमित दरवाढीचा फायदा घेऊन त्याआड दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यापेक्षा दिलेले आश्वासन खरोखर कधी पूर्ण करणार हे एकदा सांगून टाका..