नाशिक : कुंभमेळ्याच्या निमित्ताने येणाऱ्या खालशांना भक्तगणांकडून मोठ्यात प्रमाणात देणग्या मिळतात. इतक्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या देणग्यांचे काय होते? असा प्रश्न सामान्यत: निर्माण होत असला तरी देबट बैठकीत या निधीचे सर्व आखाडे आणि खालशांना ठरल्यानुसारच वाटा दिला जातो. साधूंच्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी आणि अन्य सुविधांसाठी वापरला जातो.कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंचे आखाडे आणि खालशांचे आलिशान स्वरूप बघितल्यानंतर अनेकदा सर्वसामान्यांना आश्चर्य वाटते. त्यातच एकेका आखाड्यात असलेल्या साधूंची संख्या बघितल्यानंतर या सर्वांचा उदरनिर्वाह कसा असेल असाही प्रश्न निर्माण होतो; परंतु कुंभमेळ्यात मिळालेले दान हा साधू समाजाला मोठा आधार असतो. कुंभमेळ्यात येणारे भाविक आणि दानी व्यक्ती मोठ्या प्रमाणात आखाड्यांना आणि खालशांना देणग्या देतात. या देणग्या जमा झाल्यानंतर पर्वणीनंतर आखाड्यांंच्या बैठकीत म्हणजेच देबटच्या वेळी तिन्ही आखाड्यांची एकत्रित बैठक होते. या बैठकीत सर्व खालसे आणि आखाडे जमलेल्या देणग्यांचा हिशेब देतात आणि त्यानंतर ठरलेल्या हिश्यानुसार ही रक्कम संबंधित खालसे, आखाडे, ठाणे आणि छावण्या यांना दिली जाते. एखाद्या आखाड्यात किंवा खालशात साधूंची संख्या कमी अधिक असली, तर त्यानुसार भेदाभेद केले जात नाही, ठराविक रक्कम दिलीच जाते; परंतु त्यापलीकडे जाऊन एखादी बैठक कमकुवत असेल अशा ठाण्यांना अधिक आर्थिक मदत केली जाते. म्हणजेच एखाद्या ठिकाणी आखाड्यांची शाखा असलेल्या ठिकाणी इमारत सुधारणा, निवास व्यवस्था अशा तत्सम सुधारणांची गरज असेल तर त्याचा विचार केला जातो आणि त्यांना अधिक रक्कम दिली जाते. काही रक्कम पुढील कुंभमेळ्यात तयारीसाठीदेखील बाजून काढून ठेवली जाते. नाशिकनंतर आता लगेचच उज्जैन येथे कुंभमेळा असून, त्याच्या तयारीसाठीही निधीही संबंधित जबाबदारी दिलेल्या खालशांकडे दिला जातो. (प्रतिनिधी)
कुंभमेळ्यातील दानाचे होते वाटप
By admin | Updated: September 7, 2015 22:26 IST