आजरा : आजरा साखर कारखाना चांगला चालू होता; पण विरोधी राष्ट्रवादीच्या संचालकांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. हसन मुश्रीफ यांना सांगून कारखाना बंद पाडण्याचा तगादा लावला होता. तरीही कारखाना सुस्थितीत सुरू होता. मग कामगारांना हाताशी धरून कारखाना बंद पाडण्यात आला, असा आरोप आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांनी केला. ते आजरा सूतगिरणीच्या कार्यस्थळावर गोकुळ निवडणुकीबाबत आयोजित बैठकीत बोलत होते.
तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच विकासाला महत्त्व दिले. विरोधकांच्या षड्यंत्रानंतर कारखान्याचे अध्यक्षपद सोडले. त्यावेळी ३९ कोटी असणारे कर्ज ६५ कोटींवर गेले. यामध्ये तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काय चूक, असा सवालही चराटी यांनी केला. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत गेल्या वेळी तालुक्यातून १६० मतांची व्यवस्था करून दिल्यानंतर सत्तारूढ पॅनल निवडून आले; पण गेल्या पाच वर्षांत महादेव महाडिक किंवा आमदार पी. एन. पाटील यांनी आम्हाला विचारात घेतले नाही. कारखान्याला कर्ज देताना जिल्ह्यातील नेत्यांनी राजकारण केले. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही ताकद दाखविणार आहे, असेही अशोक चराटी यांनी सांगितले.
मेळाव्यास विलास नाईक, विजयकुमार पाटील, के. व्ही. येसणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रमेश रेडेकर, दिगंबर देसाई, सुरेश डांग, डॉ. अनिल देशपांडे, दशरथ अमृते, राजू पोतनीस, निवृत्ती शेंडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. इंद्रजित देसाई यांनी आभार मानले.
- आजरा कारखान्याबाबत हात आखडता का ?
जिल्ह्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या साखर कारखान्यांना जिल्हा बँक अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी मदत केली; पण आजरा कारखान्याला उभारी देण्यासाठी हात आखडता का घेतला, असा सवालही अशोक चराटी यांनी केला.
-------
गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी आपल्याकडे ४० ठरावधारक आहेत; पण स्वाभिमान गहाण ठेवून कोणताही निर्णय घेणार नाही, असे अशोक चराटी यांनी सांगून महादेव महाडिक, आमदार पी. एन. पाटील यांच्यावर थेट आरोप केले.
-------------------
* कारखाना सुरू करण्याच्या अभिवचनाचे काय ?
कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी आपले मेडिकल कॉलेज बंद पडले तरी चालेल; पण कारखाना सुरू करणार असे अभिवचन दिले होते. त्याचे काय झाले, असाही सवाल अशोक चराटी यांनी केला.