साधारण सत्तरीचा काळ असेल एनसीसी बटालियनचे सामने कऱ्हाड येथील शिवाजी स्टेडियम येथे होते. या सामन्यात आम्ही ‘शिवाजी’कडून हरलो. हा सामना वादग्रस्त झाला. सामन्यानंतर कोल्हापूरला येण्याची सोय संयोजकांनी केली होती. मात्र, रागाच्या भरात आम्ही सगळे खेळाडू कऱ्हाडहून चालत कोल्हापूरला आला. यासह असे अनेक किस्से प्रॅक्टिस क्लब व एस. टी महामंडळाचे माजी फुटबॉलपटू किसन सुतार सांगत होते. मी १९६२ ते १९८५ सालापर्यंत फुटबॉल खेळलो. कधीही मला जखमी म्हणून संघाबाहेर बसावे लागले नाही. शाहू दयानंद हायस्कूलकडून आंतरशालेय स्पर्धेत खेळलो. पुढे गोखले कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर गोखलेकडून आंतरविभागीय व आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत सलग चार ते पाच वर्षे विजेतेपद पटकावले. या काळात आम्ही सतत जिंकत असल्याने त्याकाळी न्यू कॉलेजने कोल्हापुरातील नामवंत फुटबॉलपटूंना एकत्रित करून आमच्या विरुद्ध सामना खेळला तरीही आम्हीच विजयी ठरलो. एकदा आमचा सामना मित्रपरिवार संघाबरोबर होता. आम्ही सहज सामना जिंकू असे आम्हाला त्यावेळी वाटले. मात्र, बघता-बघता हाफच्या अगोदरच मित्रपरिवार संघाने तीन गोल आमच्यावर केले. दुसऱ्या हाफमध्ये आम्ही कसेबसे दोन गोल फेडू शकलो. त्यामुळे समोरच्या संघाला कमी लेखायचे नाही, असा धडा आम्हाला मिळाला. प्रॅक्टिस आणि शिवाजी या पारंपरिक संघात त्यावेळी अनेक सामने होत असत. अशाच एका सामन्यात आमचा गोलरक्षक प्रकाश रेडेकर गोलरक्षण करताना जखमी झाला. संघनायकाने मला गोलरक्षण कर म्हणून सांगितले. त्यावर मीही गोलरक्षण केले. हा सामना आम्ही जिंकला. आजच्या खेळाडंूमध्ये स्टॅमिना कमी आहे. त्याचबरोबर सांघिक भावना कमी आहे. सामना म्हटले की, हार-जीत होतच असते, मात्र खिलाडूवृत्ती संपत चालली आहे. शब्दांकन : सचिन भोसले
सामना हरल्यानंतर कऱ्हाडहून चालत आलो
By admin | Updated: January 17, 2015 00:26 IST