कोल्हापूर : गांधीनगर, वळिवडे (ता. करवीर) येथे भेसळयुक्त फरसाणा उत्पादन करणाऱ्या दोन फर्मवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकल्याने व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे. त्यातील दोषींवर फौजदारी होण्याची शक्यता असून याबाबतचा अहवाल आल्यानंतर कारवाई होणार आहे. यापुढे प्रशासनाकडून भेसळी विरोधातील मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.भेसळयुक्त फरसाणा उत्पादन सुरू आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाल्यानंतर गुरुवारी साहाय्यक आयुक्त (अन्न) संपत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सावंत यांनी चंद्रलाल किकोमल अंमलाणी (गांधीनगर) यांच्या के. बी. कन्फेक्शनरीवर व विकी हरेशलाल मनचुडिया (वळिवडे) यांच्या यश फरसाण केंद्रावर छापा टाकला. या ठिकाणी सिंथेटिक खाद्यरंग वापरून अस्वच्छ व अनारोग्यकारक वातावरणात फरसाण, शेवचे उत्पादन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी ४ लाख ६० हजार रुपये किमतीचा ३ हजार ५४० किलो फरसाण व फरसाणला कृत्रिम रंग आणण्यासाठी वापरलेला ४ हजार ८० रुपयांचा १२ किलो सिंथेटिक खाद्यरंगाचा साठाही जप्त करण्यात आला आहे.भेसळयुक्त फरसाणचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पंधरा दिवसांत त्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्राप्त होईल. त्यानंतर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून अन्न सुरक्षा आयुक्त, मुंबई यांच्याकडून परवानगी घेऊन फौजदारी कारवाई केली जाणार आहे तसेच जप्त केलेला भेसळयुक्त फरसाणाही नष्ट केला जाणार आहे. भेसळीबाबत गांधीनगर व वळिवडे परिसरातून अनेक तक्रारी कार्यालयाकडे आल्या आहेत. त्यामुळे ही मोहीम तीव्र केली जाणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
भेसळयुक्त फरसाणा; फौजदारी शक्य
By admin | Updated: December 19, 2014 23:22 IST