संतोष मिठारी - कोल्हापूर -लोकसहभाग आणि शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ आपल्या कार्यक्षेत्रातील सहा गावे ‘आदर्श दत्तक ग्राम’ म्हणून विकसित करणार आहे. याबाबतचा प्रस्तावित नियोजन आराखडा बनविण्याचे काम विद्यापीठाकडून सुरू आहे.नवी दिल्लीतील विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) आणि केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार ‘स्वच्छ भारत-स्वस्थ भारत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. शिवाय यासाठी स्वच्छ भारत- स्वस्थ भारत अभियान समिती नियुक्त केली आहे. समितीने आदर्श दत्तक ग्रामसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे सांगाव (ता. कागल), कडगाव (ता. गडहिंग्लज), सांगलीतील वाडीभागाई (ता. शिराळा), तडवळे (ता. आटपाडी) आणि साताऱ्यातील माहुली (ता. सातारा), शिरढोण (ता. कोरेगाव) यांची निवड केली. या गावांच्या मूलभूत गरजा विचारात घेऊन लोकसहभागातून ग्रामसूक्ष्म नियोजन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाने मुख्य समन्वयक, जिल्हानिहाय समन्वयक व उपसमिती कार्यान्वित केल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून या गावांचे प्रस्तावित नियोजनाचे काम सुरू आहे. या उपक्रमाबाबत विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड म्हणाले, जिल्हा समन्वयकांची कार्यवाही सुरू झाली आहे. संबंधित गावांमध्ये २० आॅगस्टपर्यंत भेटी देऊन तेथील सरपंच व अन्य पदाधिकारी, ग्रामस्थांशी चर्चा करून गावांच्या प्राथमिक गरजांची माहिती घेतली जाईल. आॅक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान या गावांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.या मुद्यांवर असेल भर...शौचालयांची उभारणी वृक्षारोपण आणि जुन्या वृक्षांचे संवर्धन प्लास्टिकमुक्त पर्यावरण रेन वॉटर हार्वेस्टिंगग्रीन बिल्डिंग संकल्पनेचा विकास पर्यावरणपूरक कचरा निर्मूलनसौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांच्या वापरावर भर असा साधणार गावचा विकास...विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ आणि यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रूरल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ‘आदर्श दत्तक ग्राम’ उपक्रम राबविण्यात येईल. निवडलेल्या सहा गावांच्या विकासासाठी पाच वर्षांची मुदत राहणार आहे. जिल्हा उपसमित्या संबंधित गावांचा अभ्यास करून ग्रामविकास आराखडा तयार करतील. शिवाय लोकसहभागाचे मूल्यांकन करतील. ग्रामविकासाच्या उपयुक्त आणि आवश्यक असणाऱ्याच योजना राबविण्यात येतील. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी मिळविला जाईल. ‘आदर्श दत्तक ग्राम’ उपक्रमात विद्यापीठातील विविध विभागांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
लोकसहभागातून विद्यापीठ साकारणार ‘आदर्श दत्तक ग्राम’
By admin | Updated: July 30, 2015 00:46 IST