राजाराम लोंढे -- कोल्हापूर --बियाणे पुरवठा करताना विक्रेत्यांना वेठीस धरणाऱ्या कंपन्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. येत्या दोन दिवसांत बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची बैठक घेऊन विक्रीचा आढावा घेतला जाणार असून त्यामध्ये दोषी आढळलेल्या कंपन्यांचा ‘परवाना रद्द’च्या कारवाईचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत. त्यामुळे विक्रेत्यांकडून आगाऊ पैसे घेऊन बियाण्यांचा पुरवठा न करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. यंदा खरिपाचे क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांची बियाण्यांची गरज वाढणार असल्याने बियाणे व खते विक्रेत्यांनी जानेवारीपासूनच याची तयारी केली होती. त्यासाठी कंपन्यांना बुकिंग केलेल्या भात, सोयाबीन बियाण्यांची संपूर्ण रक्कम आगाऊ दिली होती. लाखो रुपयांची गुंतवणूक करून कंपनीकडून बियाणे येणार म्हणून विक्रेत्यांनी स्थानिक पातळीवरील विक्रेत्यांकडून बुकिंग करून घेतले होते. गेली महिनाभर विक्रेत्यांनी बियाणे पुरवठा करण्यासाठी कंपन्यांचे उंबरठे झिजवले, पण केवळ बुकिंग मालाच्या निम्माच बियाण्यांचा पुरवठा केल्याने विक्रेते अडचणीत आले आहेत. मालही देईनात आणि पैसेही परत करत नाहीत. पैसे मागितले तर पुढील वर्षी मालच देणार नसल्याची तंबी देत असल्याने विक्रेत्यांना तोंड दाबून मुक्याचा मार सहन करावा लागत आहे. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारच्या अंंकात ‘बियाणे कंपन्यांकडून विक्रेत्यांना ठेंगा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी घेतली. त्यांनी याबाबतची संपूर्ण माहिती गोळा करण्यास सुरूवात केली आहे. येत्या दोन दिवसांत संबंधित कंपन्यांची आढावा बैठक घेऊन बियाण्यांची मागणी व पुरवठा याची माहिती घेऊन दोषींवर थेट ‘परवाना रद्द’ची कारवाई करण्याची तयारी कृषी विभागाने केली आहे. तुलनात्मक पेर क्षेत्र, हेक्टरमध्ये पीकगतवर्षीयंदाभात१ लाख ३ हजार१ लाख १० हजार सोयाबीन४२ हजार ९००५३ हजार ६००भुईमूग४८ हजार २००५२ हजार १००तूर२८ हजार३० हजारमूग१४ हजार३५ हजारउडिद१५ हजार३० हजार ऊस१ लाख ४५ हजार१ लाख ३२ हजार
...तर बियाणे कंपन्यांवर कारवाई
By admin | Updated: June 14, 2016 00:46 IST