७७९० उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद ;उद्या गुलाल कोल्हापूर : जिल्ह्यातील ३७० ग्रामपंचायतींसाठी शनिवारी तणावाच्या वातावरणात इर्षेने ८५.१८ टक्के, तर ४० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत ८५.६४ टक्के मतदान झाले. सकाळी साडेसातपासूनच मतदानासाठी केंद्रांवर रांगा लागल्याने सकाळी अकरापर्यंत निम्म्यापेक्षा अधिक मतदान झाले. अनेक ठिकाणी बोगस मतासह मतदान करण्यावरून खडाजंगी व बाचाबाचीचे प्रकार घडले. ३९६३ जागांसाठी रिंगणात असलेल्या ७७९० उमेदवारांचे भवितव्य मतदान मशीनमध्ये बंद झाले. मतमोजणी उद्या, सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. साधारणत: दुपारी दोनपर्यंत संपूर्ण निकाल लागेल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यात जिल्'ातील ४१६ ग्रामपंचायतींचे निवडणूक कार्यक्रम लागले होते. त्यापैकी ४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. १ हजार ५०७ प्रभागात ३ हजार ९६३ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. ४७ संवेदनशील गावांत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पक्षापेक्षा स्थानिक सोयीनुसार आघाड्यांमध्ये लढती झाल्या. विधानसभा निवडणुकीत एकत्र असणाऱ्यांनीच एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. काही ठिकाणी मतदानाची वेळ सुरू होण्यापूर्वी मतदारांनी केंद्राबाहेर मतदानासाठी रांगा लावल्या. यावरून निवडणुकीतील चुरस स्पष्ट होते. दुपारी दीडपर्यंत जिल्'ात सरासरी ६२.१८ टक्के मतदान झाले होते. दुपारच्या सत्रात मतदानाचा काहीसा वेग मंदावला. दुपारी साडेतीन वाजता सरासरी ७५.६५ टक्केमतदान झाले होते. दुपारी चारनंतर मतदारयाद्या चाळून मतदान न झालेल्यांचा शोध सुरू झाला. शेवटपर्यंत जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये ईर्षा लागली होती. सर्वच ठिकाणी काटा लढत असल्याने मतदारांना खूश करण्याची एकही संधी उमेदवारांनी सोडली नाही. अनेक गावांत ‘अंगठी’ चिन्ह असलेल्या उमेदवारांनी थेट सोन्याच्या अंगठ्यांचे वाटप केले. पैसा, दारू, मटणाचा तर अक्षरश: महापूरच आला होता. अनेक ठिकाणी पाच किलो साखर, गुळाचे रवे देऊन मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांना प्रलोभने दिली जात असताना जिल्हा प्रशासनाचा कोठेही अंंकुश दिसला नाही. दृष्टिक्षेपात निवडणूक - निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत-४१६ बिनविरोध - ४६ प्रत्यक्ष निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती- ३७० मतदार- ८ लाख ६४ हजार प्रभाग- १५०७ जागा- ३९६३ उमेदवार- ७७९०
जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी इर्षेने ८५ टक्के मतदान
By admin | Updated: July 26, 2015 00:41 IST