कोल्हापूर : येथील बाल कल्याण संकुलातील ३६ मुलांनी कोरोनावर मात केली. चौदा दिवसांच्या उपचारानंतर ही मुले बाल कल्याण संकुलातील आपल्या घरट्यात पोचली. शिवाजी विद्यापीठातील कोविड केअर सेंटर येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
बाल कल्याण संकुलातील एकूण ३६ मुले ९ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सुरुवातील १३ मुलांना कोरोनाच्या संसर्ग झाला होता. त्यानंतर इतर मुलांची चाचणी केल्यानंतर पुन्हा २३ मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. या मुलांना कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. या मुलांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर, नोडल ऑफिसर डॉ. नीलेश लांब यांनी विशेष दक्षता घेऊन उपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.