कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ साठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि ओटीएसपीच्या ३१८ कोटी ८१ लाखांच्या प्रस्तावित आराखड्याला शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यंदा जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या सर्वसाधारण, विशेष घटक योजना आणि ओ.टी.एस.पी.साठी ३२१ कोटी ७६ लाखांच्या मंजूर नियतव्ययापैकी २१८ कोटी ३९ लाखांचा निधी वितरित केला असून, डिसेंबरअखेर १४९ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. उर्वरित निधी येत्या मार्चअखेर सर्व कार्यान्वित यंत्रणांनी करावा, असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी येथे दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांच्यासह समितीचे सदस्य यांची उपस्थिती होती. जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ साठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि ‘ओटीएसपी’च्या ३१८ कोटी ८१ लाखांच्या प्रस्तावित आराखड्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी २१६ कोटी १९ लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १०० कोटी ८१ लाख आणि ‘ओटीएसपी’साठी १ कोटी ८१ लाखांच्या तरतुदीचा समावेश आहे. याशिवाय ९३ कोटी ६० लाखांची प्रस्तावित अतिरिक्त तरतुदीच्या प्रस्तावासही यावेळी मान्यता देण्यात आली. यामध्ये कृषी विभागाकडील सूक्ष्मसिंचन योजना, पशुवैद्यकीय सेवांचा विस्तार व बळकटीकरण, वनसंरक्षण व संवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, ग्रामपंचायतींचे स्मशानशेड बांधकाम, लघुसिंचन, अपारंपरिक उर्जा विकास कार्यक्रम, उद्योजकता प्रशिक्षण व बीज भांडवल, रस्ते आणि साकव विकास, यात्रा स्थळांचा विकास, प्राथमिक शाळांची विशेष दुरुस्ती कार्यक्रम, आय. टी. आय.साठी यंत्रसामुग्री व आधुनिकीकरण, कौशल्य विकास कार्यक्रम, सार्वजनिक आरोग्य सुविधांचा विस्तार व बळकटीकरण, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम, नगरोत्थान महाअभियान, अंगणवाड्या बांधकाम आणि नावीन्यपूर्ण योजनेसाठीही विशेष तरतूद करण्यात आल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री पाटील म्हणाले, चालू आर्थिक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजना आराखड्यांतर्गत देण्यात आलेल्या निधीचा योग्य विनियोग त्या त्या योजनांवर वेळेतच करावा. डिसेंबरअखेर ६८.२४ टक्के इतका निधी खर्च करण्यात आला आहे. यंदाच्या नावीन्यपूर्ण योजनेसाठी उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे व्हेंटिलेटरसाठी २३ लाख ४४ हजार, अंगणवाडीसाठी इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे, कुपोषित आकलन प्रणालीसह मशीन खरेदीसाठी ४० लाख ४२ हजार, भूमी अभिलेख कार्यालयासाठी इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशीन खरेदीसाठी ३० लाख आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई माध्यमिक, शैक्षणिक गुणवत्ता अभियानासाठी ५ लाखांच्या तरतुदीचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
३१८ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता
By admin | Updated: January 3, 2016 00:54 IST