लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : ‘गोकुळ’साठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी उद्या, सोमवारी होत असून पॅनलची बांधणी बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात आहे. सत्तारूढ गटात पहिल्यांदाच किमान ११ नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून त्यांच्याकडून १०, तर विरोधी आघाडीकडून तीन विद्यमान संचालकांना संधी मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत विरोधी आघाडीच्या बहुतांश बिनीच्या शिलेदारांना घरीच बसावे लागणार, हे मात्र निश्चित आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने एकीकडे चिंतेचे वातावरण असताना, कोल्हापूर जिल्ह्यात मात्र कोरोनापेक्षा ‘गोकुळ’च्या निवडणुकीची उत्सुकता अधिक पाहावयास मिळते. त्याला कारणही तसेच असून ही निवडणूक मंत्री, आमदारांनी प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले असले तरी संधी कोणाला द्यायची, असा पेच नेत्यांसमोर आहे. एरव्ही सत्तारूढ गटातील प्रस्तापितांमुळे नवीन चेहऱ्यांना कमी संधी मिळायची. या वेळेला तीन वाढीव जागा व पाच विद्यमान संचालकांनी फारकत घेतल्याने नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते.
मागील निवडणुकीत जोखीम असतानाही नेत्यांनी संधी दिली म्हणून विरोधी आघाडीकडून अठरापैकी तब्बल चौदा नवीन चेहऱ्यांनी निवडणूक लढविली. प्रस्तापितांविरोधात निकराची झुंज दिली होती. गेली पाच वर्षे त्यांनी सतेज पाटील यांच्या रस्त्यावरील लढाईत साथ देत वातावरण निर्मिती केली. त्यातून ‘गोकुळ बचाव’बाबत दूध उत्पादकांसह ठरावधारकांमध्ये सहानुभूती तयार झाली. पाच वर्षे संघर्ष करणाऱ्यांना सोबत घेऊन पॅनेलची बांधणी होईल, असे वाटत असतानाच वारसदार पुढे आले आणि बिनीच्या शिलेदारांची नावे मागे पडू लागल्याने दूध संस्था प्रतिनिधीमध्येही अस्वस्थता आहे.
सत्तारूढ गटाकडून नऊ ते दहा, तर विरोधी आघाडीकडून तिघांना संधी मिळू शकते. सत्तारूढ गटाकडून किमान ११ नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.
तुमचे वारसदार, तर आमचे कार्यकर्ते
सत्तारूढ गटातून चेतन नरके, दीपक पाटील, धैर्यशील देसाई, अनुराधा पाटील, शौमिका महाडिक, उदय पाटील एवढ्याच थेट नेत्यांच्या घरांतील व्यक्तींना संधी मिळू शकते. उर्वरितपैकी किमान १२ कार्यकर्त्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न असून, तुमचे वारसदार तर आमचे कार्यकर्ते हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो.