उल्हासनगर : शहरातील आरक्षित व खुल्या भूखंडावर अतिक्रमण होत असताना शुक्रवारी महसूल विभागाने सी ब्लॉक येथील एका खुल्या भूखंडाला पत्र्याचे संरक्षण कवच देण्याचा प्रयत्न केला. मात्र हे संरक्षण कवच किती दिवस राहणार, याबाबत सोशल मीडियावर चर्चेला ऊत आला आहे.
उल्हासनगरात सर्रासपणे आरक्षित भूखंड, खुल्या जागा, शासकीय जागेवर अतिक्रमण होऊन जागेच्या सनद काढल्या आहेत. यातून महापालिका शाळा मैदान, पोलीस वसाहत, महाराष्ट्र जिवण प्राधिकरण कार्यालयाचे निवासस्थान व शहरातील खुल्या जागा सुटल्या नाही. हे कमी म्हणून की काय वालधुनी नदी पुरनियंत्रण रेषा व किनाऱ्यावरील जागेची सनद घेऊन, त्याबदल्यात महापालिकेकडून कोट्यावधीचा टीडीआर घेतल्याचे आरोप होत आहे. अश्या वेळी महसूल विभागाने सीब्लॉक येथील एका खुल्या भूखंडाला पत्र्याची संरक्षण भिंत बांधली. तसेच सरकारी भूखंड (शासनाची मालमत्ता) असे नामफलक लावले. महसूल विभागाच्या या कामाचे शहरात कौतुक होत आहे. तर दुसरीकडे भूखंडा भोवती किती दिवस पत्र्याचे संरक्षण कवच राहते. असी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यापूर्वीही अनेक भूखंडावर लावण्यात आलेले शासनाची मालमत्ता नामफलक गेले कुठे? असा प्रश्नही विचारला जात आहे.
भुमाफीया सक्रिय शहरातील अनेक आरक्षित जागा व खुल्या जागेवर भुमाफीयांची नजर पडली असून त्यावर सनद काढल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रांत कार्यालयाकडून अश्या सनद दिल्या गेल्याने, काही वर्षांपूर्वी नागरिकांनी सनद रद्द करण्यासाठी मोर्चे काढले होते. महसूल विभागाच्या कारवाईने भुमाफीयाचे धाबे दाणणले असून ते सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.