Missing Lady found after 25 years : कर्नाटकातील बेल्लारी येथे राहणारी एक महिला २५ वर्षांपूर्वी पती आणि चार मुलांना सोडून कुठेतरी गेली होती. घरच्यांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र महिलेबाबत काहीही माहिती मिळाली नाही. महिला मानसिकदृष्ट्या आजारी होती. काहीतरी अनुचित प्रकार घडला असावा असे मानून काही वर्षांनी कुटुंबीयांनी तिला मृत मानले आणि तिचे अंत्यसंस्कार केले. पण एक दिवस अचानक तब्बल २५ वर्षांनंतर ती महिला पुन्हा तिच्या कुटुंबाला भेटली. एखाद्या चित्रपटाच्या कहाणीप्रमाणे ही गोष्ट घडली.
२५ वर्षे कुठे होती आई?
सकम्माचा विवाह केंचिना बांदी गावातील नागेशशी झाला होता. त्यांना चार मुलेही होती. त्यातील एकाचा नंतर मृत्यू झाला. एके दिवशी अचानक सकम्मा घरातून निघून ट्रेनमध्ये चढली. मग तिथून ती कशीतरी हिमाचल प्रदेशातील मंडीत पोहोचली. ती येथे गरीब जीवन जगत होती. २०१८ मध्ये, सकम्मा हिमाचलमध्ये अत्यावस्थ अवस्थेत सापडली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने तिला वृद्धाश्रमात ठेवले.
पुढे काय घडले?
सकम्मा हिला भांगरोटू वृद्धाश्रमात ठेवण्यात आले होते. मंडीच्या उपायुक्तांच्या म्हणण्यानुसार, प्रशासकीय अधिकारी अशा सर्व वृद्धाश्रमांना वेळोवेळी भेट देत असतात आणि तेथील सुविधांचा आढावा घेतात. १८ डिसेंबरला मंडीचे सहाय्यक उपायुक्त रोहित राठोड भंगारोटू वृद्धाश्रमात पोहोचले, तेव्हा त्यांना येथे सकम्मा दिसली. ७० वर्षीय महिलेला हिंदी येत नसून ती कर्नाटकातील असल्याचे त्यांना समजले.
पालमपूर SDM ची झाली मदत
मंडीचे ADC रोहित राठोड यांनी पालमपूरच्या SDM एसडीएम नेत्रा मैत्ती यांना सकम्मा यांच्याशी कन्नड भाषेत बोलण्यासाठी संपर्क साधला. नेत्रा या कर्नाटकच्या रहिवासी आहे. त्यांनी सकमाशी कन्नड भाषेत फोनवर बोलून त्यांच्या घराची आणि कुटुंबाची माहिती घेतली. यानंतर नेत्रा मैती यांनी मंडी जिल्ह्यात कार्यरत कर्नाटकातील आयपीएस प्रोबेशनर रवी नंदन यांना भांगरोटू वृद्धाश्रमात पाठवले. त्यांनी सकम्मा यांच्याशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ बनवला आणि तो कर्नाटक सरकारला शेअर केला.
सकम्मावर अंत्यसंस्कार का केले?
मंडीचे उपायुक्त म्हणाले की, हिमाचल प्रदेश सरकार, अधिकारी आणि कर्नाटक सरकारच्या मदतीने सकम्माच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात आला. कुटुंबीयांनी २५ वर्षांपूर्वीच सकम्मा यांना मृत समजून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. कुटुंबीयांनी सकम्माच्या हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही दिवसांनी कर्नाटकात एका महिलेचा मृतदेह अपघातात सापडला होता. पोलिसांनी सकम्माच्या कुटुंबीयांना ही माहिती दिली होती. त्यामुळे सकम्माला मृत समजून त्यांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
२५ वर्षांपूर्वीच्या गोष्टी लक्षात
सकम्माची मानसिक स्थिती अद्यापही चांगली नाही. तिला २५ वर्षांपूर्वीच्या गोष्टी आठवतात आणि ती कन्नड भाषेत सांगते की तिला लहान मुले आहेत. तिची ती मुले आता मोठी झाली आहेत याची तिला कल्पनाच नाही. कर्नाटक सरकारने सकम्माला मंडीतून परत आणण्यासाठी तीन अधिकाऱ्यांना पाठवले. त्यानंतर सकम्माला परत कर्नाटकात आणण्यात आले. सकम्माची मुले विक्रम, बोधराज आणि लक्ष्मी यांनी सांगितले की, विमानतळावर आईला पाहताच त्यांचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिन्ही मुले आईला मिठी मारून रडू लागली. सकम्मा आता आजीही झाली आहे. नातवांची आजी परत आल्याने त्यांनाही खूप आनंद झाला आहे.