हजारो कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरलेली दारू जिल्ह्यातून हद्दपार करावी यासाठी आदिवासी भागातून तीव्र सूर उमटत असून त्याला जिल्ह्यातील विविध घटकांतूनही पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात शासनाने भूमिका घ्यावी, असा आग्रह जिल्ह्यातून होत आहे. बिहार राज्यात दारूबंदीचा निर्णय तेथील मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर महाराष्ट्रातही कमी-अधिक प्रमाणात हा सूर उमटू लागला आहे. याबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यातही स्वतंत्र चर्चा सुरू झाली आहे. राज्यात दारूबंदीचा निर्णय होवो अथवा न होवो पण आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात हा निर्णय व्हावा, असा सूर जिल्ह्यातून उमटत आहे. नंदुरबार जिल्ह्यात दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांची संख्या मोठी असून उत्पन्नाचे स्त्रोतही कमी आहे. अशा स्थितीत लोकांच्या हाती जो पैसा येतो, त्यात बहुतांश लोक दारूच्या व्यसनात उडवतात. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे एक ना अनेक सव्रेक्षणातून निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात कुपोषणाचे व बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याला काही अंशी दारूचे व्यसनही जबाबदार असल्याचे मत सातपुडय़ातील आदिवासी भागातील जाणकार व्यक्त करू लागले आहे. त्यामुळे यापूर्वीच सातपुडय़ात व्यसनमुक्तीची चळवळ सुरू झाली आहे. गेल्या तीन वर्षात अनेक मेळावे त्या भागात झाले. एवढेच नव्हे तर दारूबंदीसाठी अनेक गावात आता ग्रामसभेत ठरावदेखील होऊ लागले आहेत. या पाश्र्वभूमिवर संपूर्ण जिल्ह्यातच दारूबंदी करण्याची मागणी पुढे येत आहे.
जिल्ह्यात दारूबंदीसाठी आग्रह
By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST