विसरवाडी : वादळी पावसात झाडावर वीज पडून हंसराज भरत पाडवी (वय ४६) व हर्षल सुरेश वळवी (वय १० वर्षे) हे दोन जण जागीच ठार तर चार जण जखमी झाले. भरडू, ता.नवापूर येथे रविवारी सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली. हंसराज हे सासरवाडीला आले होते. मूळ पिंपळोद, ता.नंदुरबार येथील रहिवासी असलेले हंसराज पाडवी हे सासरवाडी भरडू, ता.नवापूर येथे आले होते. परिवारासह इतर नातेवाइक शेतात शेंगा उपटण्याचे काम करीत होते. सायंकाळी जोरदार वादळ झाले. यामुळे परिवारातील सदस्य जवळच आंब्याच्या झाडाखाली थांबले. या वेळी वीज या आंब्याच्या झाडावर कोसळली व हंसराज भरत पाडवी (वय ४६) व हर्षल सुरेश वळवी (वय १० वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिना गिरीश वळवी (२३), छोटूबाई विजयसिंग वळवी (५०), अशोक विजेसिंग वळवी (३७) व महिमा अशोक वळवी (१५) हे चार जण जखमी झाले. यातील रिना वळवी हिस विसरवाडी ग्रामीेण रुग्णालयात, तर उर्वरित तिघांना नंदुरबार येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत हंसराज हे जवाहर, जि.ठाणे येथे वनविभागात लेखापाल होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. (वार्ताहर)
भरडू येथे वीज पडून दोन जणांचा मृत्यू
By admin | Updated: May 19, 2014 01:46 IST