याबाबतची माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील तिघे मित्र विवेक सुनील पाटील (१६), श्याम राजेंद्र पाटील (१६) व देवानंद सोपान पाटील (१७) हे मोटारसायकल क्र. एमएच १९ यु ७८६३ ने भुसावळकडून घरी तळवेलकडे परत जात होते. त्या वेळी त्यांच्या मोटारसायकलला फुलगावजवळील राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. मोटासायकलला ही धडक एवढी जोरात होती की तिघे फेकले गेले. त्यात मोटारसायकलस्वार विवेक सुनील पाटील याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला तर श्याम राजेंद्र पाटील व देवानंद सोपान पाटील या दोघा मित्रांना जखमी अवस्थेत उपचारासाठी जळगाव येथील गोदावरी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार घेत असताना त्यांचाही त्यात मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी काही वेळातच मोठी गर्दी झाली होती. काही जणांनी पोलिसांना माहिती कळविल्यानंतर पोलीस तेथे दाखल झाले व जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले. रात्री उशिरा वरणगाव पोलिसात घटनेप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गावात शोककळा
तळवेल येथील ही तीनही मुले जीवलग मित्र म्हणून प्रसिद्ध होते. कोठेही ते एकत्रच फिरायला जात. विशेष म्हणजे तिघेही घरातील एकुलते असल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहिती कळताच तीनही कुटुंबांत एकच आक्रोश सुरू झाला होता. अपघाताच्या या घटनेमुळे संपूर्ण तळवेल गावावर शोककळा पसरली असून परिसरात तिघा मित्रांच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत होती.