औरंगाबाद : जळगाव येथील घरकुल घोटाळाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुरेशदादा जैन यांनी विधानसभा निवडणुकीसाठी १५ दिवसांचा तात्पुरता जामीन मिळावा यासाठी दाखल केलेल्या अर्जावर तसेच त्यांच्या आधीच्या अन्य दोन याचिकांवर आज बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एकत्रित सुनावणी झाली. यावेळी उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि टी.व्ही. नलावडे यांनी निर्णय राखून ठेवला.जळगाव येथील घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले आ. सुरेशदादा जैन हे विधानसभेची निवडणूक लढवीत असून, त्यांनी पंधरा दिवसांसाठी तात्पुरता जामीन मिळावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याशिवाय त्यांच्या यापूर्र्वीच्या अन्य दोन याचिका खंडपीठासमोर प्रलंबित आहेत. या तिन्ही याचिका १ आॅक्टोबर रोजी न्यायालयासमोर सुनावणीसाठी आल्या.आज पुन्हा या याचिका न्यायालयासमोर आल्या असता अॅड. सलमान खुर्शीद यांनी सुमारे दीड तास जैन यांची बाजू मांडली. यावेळी सहायक सरकारी लोकअभियोक्ता अॅड. गिरीश नाईक-थिगळे यांनी त्यांना जामीन देण्यास विरोध दर्शविला. यावेळी उभय पक्षांतर्फे विविध न्यायालयांच्या निवाड्यांचे दाखले सादर केले. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. यावेळी हस्तक्षेपक नरेंद्र पाटील यांच्या वतीने अॅड. ए.आर. सय्यद, अॅड. प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
सुरेशदादांंच्या जामिनावर निर्णय राखून ठेवला
By admin | Updated: October 9, 2014 14:57 IST