धुळे : अभियांत्रिकी पदविका परीक्षेत उत्तीर्ण न झाल्याने आलेल्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना देवपुरातील एकवीरानगरात आज घडली. विद्यार्थिनीने आई-वडिलांना चिठ्ठी लिहून माफी मागितली आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
देवपुरातील नकाणे रोडवरील एकवीरानगरातील पल्लवी गोरख पाटील (वय १९) या विद्यार्थिनीने नैराश्येतून सोमवारी दुपारी १२.३0 वाजेच्या सुमारास घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला निंबा दौलत देवरे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून विद्यार्थिनीला मृत घोषित केले. घटनेप्रकरणी देवपूर पश्चिम पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आई-वडिलांनी केला आक्रोश
आई, वडील व भाऊ हे दुपारी बाहेर गेले होते. या वेळेतच पल्लवीने तिच्या खोलीतील घराच्या छताच्या कडीला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आई, वडील घरी आल्यानंतर त्यांनी मुलीला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघितल्याने एकच धक्का बसला आणि आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी परिसरातील नागरिकांसह पल्लवीच्या कॉलेजमधील मैत्रिणींनी गर्दी केली होती. पल्लवी परिसरात ताऊ म्हणून परिचित होती.
नापास झाल्यामुळे आले नैराश्य
पल्लवी ही श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप्लोमाच्या (पदविका) पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होती. संगणक अभियांत्रिकी शाखेत तिने २0१३ मध्ये प्रवेश घेतला होता. मात्र परीक्षेत नापास झाल्यामुळे पल्लवीला नैराश्य आले होते. यातूनच तिने सोमवारी आत्महत्या केल्याची चर्चा होती.
दोन महिन्यांपूर्वी नवीन दुचाकी
एकवीरानगरपासून देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतचे अंतर पाच ते सहा कि. मी. असल्यामुळे महाविद्यालयात जाण्यासाठी पल्लवीला तिच्या वडिलांनी दोन महिन्यांपूर्वीच नवीन दुचाकी घेतली होती. ती अत्यंत मनमिळावू स्वभावाची होती.
ती परिसरातील सर्वांशी मिळून मिसळून रहायची. ती सर्वांची लाडकी होती. तिला सर्वजण लाडाने ताऊ म्हणायचे, अशी माहिती नागरिकांनी दिली.
दह्याण्याचे राहणारे
पल्लवीचे वडील गोरख पाटील हे शिक्षक असून ते मूळचे धुळे तालुक्यातील दह्याणे येथील रहिवासी आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी दोन वर्षांपूर्वीच ते एकवीरानगरात रहायला आले आहेत. पल्लवीच्या पश्चात एक लहान भाऊ आहे.
-------------------
■ प्रिय, मम्मी, पप्पा, सॉरी, मला माफ करा. मी जर काही चुकली असेल, तुम्हाला खूप दु:ख दिले असतील; पण आता मी माझं जीवन संपवून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझा अभ्यास नाही करू शकत. माझ्याकडून नाही होणार, पप्पा मला तुमचा विश्वास गमवायचा नाही. मला खूप शिकून स्वत:च्या पायावर उभं रहायचं होतं. पण मी तुमची इच्छा पूर्ण नाही करू शकत. म्हणून तुम्ही दादूला खूप शिकवा, मोठं करा, आणि भाऊ, तू त्रास नको देऊ मम्मी-पप्पांना, त्यांचे सर्व ऐकूनघेत जा, आणि त्यांची खूप काळजी घे. मम्मी- पप्पांना कधी एकटे सोडू नको, आई, अण्णा त्यांची पण काळजी घ्या, तिथं अधूनमधून जात रहा आणि माझ्या मरणाला कोणालाच दोषी ठरवू नका, आणि तुम्ही धीर सोडू नका, अश्रू पण ढाळू नका, मी वाईट नाहीये पप्पा; पण काय करू, मी तुम्हाला ताठ मानेने जगताना पाहणार होती. पण माझी इच्छा माझा भाऊ पूर्ण करेल. आत्या, दादा, मामा, मामी, शरयू, राज, आबा, आप्पा, बापू आणि सर्व, दीदी, माझा पप्पू दादा, वहिनी, मावशी, आप्पा व दह्याण्याचे सर्व आणि माझे प्रिय यांची मी माफी मागते., काही चुकलं असेल तर माफ करा...