जळगाव : गेल्या आर्थिक वर्षात शासनाने जि.प.अंतर्गत येणार्या व अतवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसंबंधीच्या निधीवरून जि.प. शिवसेना भाजपात खटके उडत आहेत.
खडके उडत असतानाच शिवसेना साथीदारांची मने दुभंगलेली असल्याने सेना नमल्याचे दिसत आहे. पण यात हा रस्ते दुरुस्तीचा कार्यक्रम मात्र रखडला आहे.
गेल्या वर्षी अतवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५२ कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने शासनाला पाठविला होता. शासनाने काही अडचणी पुढे करीत पाच कोटी ७0 लाख रुपये मंजूर केले, पण या निधीतून आपल्या गटात अधिक कामे येतील यासाठी सत्ताधारी शिवसेना भाजपात ओढाताण सुरू झाली. यात भाजपाने वर्चढ असल्याचे सिद्ध करीत मुक्ताईनगरातील रस्त्यांसाठी ८0 लाख रुपये निधीची तरतूद करून घेण्याचा प्रयत्न चालविला. त्यावर जवळपास शिक्कामोर्तबही झाले आहे.
दुसर्या बाजूला शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या धरणगाव तालुक्यासाठी २0 लाखांची तरतूद करण्यासंबंधीचे प्रस्ताव आहेत. बांधकाम व स्थायी समितीमधील समितीमधील सदस्यांनी यात कुरघोडी करीत आपापल्या गटांमध्ये प्रत्येकी आठ लाख रुपये निधी मिळून कामे होण्यासाठी तगादा लावला आहे.
बांधकाम खाते शिवसेनेकडे आहे. जि.प.उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील हे या समितीचे अध्यक्ष आहेत. पण सेनेतील सदस्यच या निधीच्या ओढाताणीत डावलले जात असल्याची सल सेनेच्या मंडळींमध्ये आहे.
सेनेतही अंतर्गत कलह
उपाध्यक्ष आपल्या कामात व्यस्त राहत असल्याने जि.प.ला हवा तेवढा वेळ देऊ शकत नाही. आपली बाजू मांडणार कोण? असे मुद्दे असतानाच सेना बॅकफूटवर गेली आहे, असे काही सदस्य खाजगीत बोलतात. आपण डावललेले गेलो म्हणून प्रस्ताव पूर्ण होऊन ते सादर होऊ द्यायचे नाही आणि हा कार्यक्रम तसाच लटकवून ठेवायचा, असे प्रयत्न काही सदस्यांनी चालविले आहेत. यामुळे पूर हानी निधीतून जि.प.च्या एकाही रस्त्याचे काम पावसाळ्य़ाचे दिवस धडकत असतानादेखील झालेले नसल्याची खंत काही सदस्यांमध्ये आहे. हा मुद्दा ५ रोजी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गाजण्याचे संकेत मिळाले आहेत.