चंद्रकांत जाधव■ जळगाव
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या दबाव तंत्राला झुगारत जिल्हाभरात सेनेच्या ताब्यात असलेल्या सर्वच्या सर्व म्हणजेच सहा जागा लढविण्याची तयारी दाखविली आहे. याद्वारे त्यांनी पक्ष संघटना कमजोर नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील दौर्यांच्या कार्यक्रमात प्रथमच त्यांनी जळगावात कणखर भूमिका मांडली.
केंद्रात भाजपाचे सरकार स्वबळावर स्थापन झाले आहे. यातच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने सेनेला बॅकफूटवर आणण्यासाठी आपले मेळावे आणि बैठकांमध्ये छुपा अजेंडा हाती घेतल्याची चर्चा होती. मुंबईत झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात भाजपातील काही मंडळींनी एकला चलो रे चा नारा दिला. त्यानंतर काही दिवसांनी नाशकात झालेल्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठकीत जळगावच्या भाजपा नेत्यांनी जळगाव शहर आणि भुसावळ या महायुतीमध्ये सेनेने लढविलेल्या जागांवर दावा केला. सेनेतर्फे या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
उपनेते गुलाबराव पाटील व दोन्ही जिल्हाप्रमुख चुप्पी साधून होते. महायुतीचे काय होईल? असे प्रश्न महायुतीमधील घटक पक्षांमधील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही पडले. जि.प. उपाध्यक्षांच्या निवासस्थानी गेल्या आठवड्यात झालेल्या मेळाव्यात सेनेच्या काही पदाधिकार्यांनी तर आदेश आले की जिल्हाभरातील सर्वच मतदारसंघांमध्ये लढू, अशी भूमिका मांडली होती.
जिल्ह्यात सेनेच्या वाट्याला सध्या पाचोरा, एरंडोल, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, चोपडा व भुसावळ हे मतदारसंघ आहेत. हे सहा मतदारसंघ सेनेकडेच राहतील आणि सेना ताकदीने निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरेल, असे संकेत पक्षप्रमुख ठाकरे यांनी बुधवारी शहरात झालेल्या मेळाव्यामध्ये दिले. या मेळाव्यामध्ये अनेक मुद्यांवर कणखर भूमिका घेत भाजपाचा कोणताही दबाव नाही आणि शिवसैनिकांनी किंतु, परंतु यात पडू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात हीच अपेक्षा शिवसैनिकांकडून होती. त्यांच्या ३५ मिनिटांच्या भाषणामध्ये विरोधकांवरील सडेतोड टीकेचे आणि शिवसेनेच्या आगामी काळातील भूमिकेचे अनेक मुद्दे आले. भाजपाशी युती राहील. भाजपाची मंडळी भेटून गेली आहे, असे त्यांनी पदाधिकार्यांना जाहीरपणे सांगून महायुतीसह शिवसैनिकांमध्ये विश्वास निर्माण केला.
भाजपानेही आता वाद उकरण्याचे प्रकार थांबवावे, असा वडिलकीचा सल्लाही त्यांनी दिला. आपल्या दौर्यात ठाकरे यांनी शहरात आल्यानंतर लागलीच आमदार सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी भेट दिली व आमदार जैन यांच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. आमदार जैन हे आमचे आहे आणि सरकार त्यांच्यावर सूड उगवत आहे, असे सडेतोडपणे सांगून हा अन्याय सहन केला जाणार नाही, सेना त्यांच्या पाठीशी आहे व यापुढेही राहील, असे स्पष्ट संकेत दिले. या मेळाव्यामुळे सेनेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्ता ऊर्जितावस्थेमध्ये आल्याची स्थिती आहे.