जळगाव : शिक्षण क्षेत्रात प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत १३ रोजी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा बंद ठेऊन संप करण्याचा निर्णय जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने घेतला आहे. गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील शिक्षण क्षेत्रात प्रलंबित असलेल्या मागण्या तत्काळ निकाली काढण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघातर्फे पाठपुरावा सुरू आहे. तरीही शासन लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळेच माध्यमिक शिक्षकांनी संघटित होऊन हा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यातदेखील माध्यमिक शिक्षकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले होते. प्रश्न मार्गी न लागल्यामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय आता शिक्षकांनी घेतला आहे. आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एच. जी. इंगळे, आर. एच. बाविस्कर, जिल्हा सचिव एस. डी. भिरुड, उपाध्यक्षा साधना लोखंडे, आर. आर. पाटील, चिटणीस बी. डी. महाले, कोशाध्यक्ष एस. एन. पाटील यांनी केले आहे.
दोन दिवस सुट्टी
शिक्षण विभागातर्फे १२ रोजी युवक दिनानिमित्त प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यात १३ रोजी माध्यमिक शिक्षकांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे शाळांना सलग दोन दिवस सुट्टी मिळणार आहे.