पावसाची दडी, पिकांची शेवटची घटका
गेल्या अनेक वर्षांपासून अवेळी आणि अपुऱ्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याला नापिकीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी तरी बऱ्यापैकी पाऊस होईल, या आशेने बी-बियाणे व खताची जुळवाजुळव केली. पावसानेही थोड्या प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकरी पेरते झाले होते. मात्र, पेरणी केलेली पिके बऱ्यापैकी अंकुरली असतानाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने पिके शेवटची घटका मोजताना दिसत आहेत.
रूसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी ‘धोंडी धोंडी पाणी दे…
पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. दरम्यान, वाकोदसह परिसरात पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळावे. याकरिता रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणत वरुणराजाला साकडं घातलं जात आहे.
दुबार पेरणीचे संकट
मान्सूनच्या पावसाने महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावली. मात्र, नंतर पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने पेरणी बऱ्यापैकी झाली नाही. काही ठिकाणी मात्र पावसाअभावी पिके शेवटच्या घटका मोजत असून, ऑक्सिजनवर आहेत. पाऊस नसल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. वाकोदसह परिसरातील शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाला आहे. पाऊस नसल्यामुळे लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस नसल्याने काही शेतकऱ्यांना पेरता येईना तर काहींना पिके जळून जाण्याची भीती आहे.