सारंगखेडा भागात वादळी गारपिटीसह पाऊस वृक्ष उन्मळले : केळी, पपई, मिरचीची रोपे उद्ध्वस्त
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा, वडाळी, कळंबू, कहाटूळ व पुसनद भागात मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता अचानक वादळी वार्यासह पाऊस आला. यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले असून, विद्युत खांबही जमीनदोस्त झाले आहेत, तर दुसरीकडे केळी, पपई, मिरची व पालेभाज्यांची रोपे जमीनदोस्त झाली आहेत. नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागात सध्या निसर्ग कोपला की काय, अशी स्थिती गेल्या साडेचार-पाच महिन्यांपासून निर्माण झाली आहे. याचा प्रत्यय वेळोवेळी गारपिटीच्या रूपातून येत आहे. त्यातच मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता वादळी वार्यासह गारांचा पाऊस झाला. तसेच अनेक ठिकाणी वृक्ष पडले असून, विद्युत खांबही जमीनदोस्त झाले आहेत. यात केळी, पपई, मिरची व पालेभाज्यांची रोपे उद्ध्वस्त झालेली आहेत. सारंगखेडा येथील हॉटेल फौजीजवळ दोन वृक्ष कोसळल्याने वाहतूक दोन तास ठप्प झाली. २५ हेक्टर क्षेत्र बाधित ४सारंगखेडा परिसरात १५ हेक्टर क्षेत्रापर्यंत पपईच्या रोपांची तसेच १० हेक्टर क्षेत्रात केळीच्या रोपांची लागवड करण्यात आली होती. ही सर्व रोपे वादळी पावसाने जमीनदोस्त झालेली आहेत. ४याशिवाय डांगरमळ्यांचेही नुकसान झाले आहे. (वार्ताहर)