राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी या काळात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. इतकेच नव्हे आपण काही तरी करीत आहे, हे दाखविण्यासाठी वारंवार प्रशासनाकडे विविध मागण्या करीत इशारे दिले जात आहे. राज्य सरकार केंद्रावर तर भाजप नेते राज्य सरकारवर टीका करीत आहे. अशाच प्रकारे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातही असेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. भाजपचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करण्यासह जिल्हा प्रशासनाकडेही वारंवार विविध मागण्या करीत आहे. यात भाजपच्या या पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यासाठी काय केले व किती निधी आणला, असाही सवाल शिवसेनेकडून उपस्थित होत आहे. कोरोना संसर्ग वाढत असताना सर्वांनी जनतेसाठी काम करणे अपेक्षित असताना राजकीय नेते मात्र या महामारीची संधी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप थांबलेले नाही. यात रुग्णसंख्या व मृतांच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करीत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केली. यामध्ये राज्य शासन कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून आपले अपयश लपविण्यासाठी कोरोनाची चाचणी, मृतांचा आकडा अशा सर्वच बाबतीत लपवाछपवी सुरू आहे. इतका वाईट प्रसंग जनतेवर आला असून, ज्या गांभीर्याने हा प्रसंग घ्यायला हवा, त्या पद्धतीने राज्य शासन गांभीर्याने घेत नाहीये, अशी टीका गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर केली होती. इतकेच नव्हे तर शासनाच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, तरीही शासन हा विषय गांभीर्याने घेत नाही. शासनाच्या अपयशामुळेच आपण ज्यांचा जीव वाचवू शकतो, अशा लोकांचाही मृत्यू होत असल्याचा गंभीर आरोप महाजन यांनी केला. रेमडेसिविर, ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा आहे. रुग्णालयांना रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी रेमडेसिविर व ऑक्सिजन मिळत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. कोरोना चाचणीचे अहवाल १२ ते १४ दिवस येत नाहीत, हे सारे चित्र गंभीर असल्याचे महाजन यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला हवी तशी मदत मिळत नसल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जात असताना गिरीश महाजन यांनाही लक्ष्य करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव महापालिकेसाठी डीपीडीसीतून निधी दिला तसेच कोरोना उपाययोजनांसाठी विविध पावले उचलल्याचे सांगत गिरीश महाजन व चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना त्यांनी किती निधी दिला, असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित केला जात आहे. या शिवाय गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते जवळपास दर आठवड्याला जिल्हाधिकारी कार्यालयात भेटी देत विविध मागण्या करीत आहे तर कधी गंभीर इशारा देत आहे. मात्र या काळात प्रशासनाला सहकार्य करीत राजकारण बाजूला ठेवून कोरोनाशी दोन हात करणे अपेक्षित असल्याची जनतेची अपेक्षा आहे.
कोरोनाच्या संकटातही राजकारण सुटेना, प्रशासनालाही वारंवार इशारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST