अमळनेर : महाराष्टÑाची प्रतिमा पुरोगामी राज्य म्हणून आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर झाला. मात्र तो पोलिसांपर्यंत अद्याप पोहचलेलाच नसल्याचे चित्र आहे. म्हणून अमावस्याच्या आदल्या दिवशी व अमावस्येच्या दिवशी जागोजागी रस्त्यांवर पोलिसांची नाकाबंदी लागत असते. चोरांचा अंधश्रद्धेवर विश्वास असल्याने त्यांना ‘नाट’ लावण्यासाठी पोलिसांना दक्ष राहण्याचे सक्त आदेश वरिष्ठांकडून देण्यात येत असतात. अशा आदेशांमुळे एकप्रकारे अंधश्रद्धेला खतपाणीच घातले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात चोरांच्या जातीने अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला आहे की जर अमावस्येच्या दिवशी चोरी केली आणि ती यशस्वी झाली तर वर्षभर चोर्या करण्यात यशस्वी होतो. पोलिसांच्या तावडीत सापडत नाहीत. विशेष म्हणजे सोमवारच्या अमावस्येला शुभारंभ करण्याची चोरांची प्रथा असल्याचे सांगण्यात येते. कोणतेही सत्कृत्य किंवा शुभकार्य करताना समाजात अमावस्या अशुभ मानली जाते. मात्र चोरी, दरोड्यासारखे दुष्कृत्य करण्यासाठी चोरांमध्ये अमावस्येचा मुहूर्त शुभ मानला जातो. म्हणून अमावस्येच्या आदल्या दिवशीच चोर आपले गाव सोडून दुसर्या गावाकडे, इच्छित ठिकाणी चोरी करण्यासाठी जात असतात. त्यामुळे अमावस्येच्या आधी व त्यादिवशी चोरांचीच वर्दळ गुप्तपणे सुरू असते. मात्र याचवेळी कोणी विचारले, हटकले तर त्यांना ‘नाट’ लागते. त्यामुळे ठरवलेल्या कामात म्हणजे चोरीच्या कामात व्यत्यय येतो, अडथळा येतो आणि ते अयशस्वी होतात, असा चोरांचा समज आहे. म्हणूनच चोरांना ‘नाट’ लावण्यासाठी हे दोनही दिवस पोलीस मंडळी डोळ्यात तेल घालून नाकाबंदी बंदोबस्त करत असते. वरिष्ठ अधिकार्यांपासून सर्वांनीच चोरांना ‘नाट’ लावणे उचित समजल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी बंदोबस्त करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे हे दोन्ही दिवस पोलिसांचा ताफा गावाबाहेर नाकाबंदी करून येणार्या, जाणार्या संशयित व अनोळखी व्यक्तीची विचारपूस करून टोकत असतात. त्यामुळे चोरांना ‘नाट’ लागत असावी व ते चोरी करण्यास धजत नसावेत, असा पोलिसांचा समज आहे. एकंदरीत महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा संमत होत असताना मात्र चोरांच्या अंधश्रद्धेला नाट लावण्यासाठी पोलिसांना अमावस्येचा मुहूर्त साधावा लागतो, ही बाब मजेशीर आहे. (वार्ताहर)
चोरांच्या अंधश्रद्धेला पोलिसांची नाट
By admin | Updated: June 1, 2014 00:37 IST