जामनेर : हरितक्रांती घडविण्याचे आपले नेहमीचे स्वप्न होते. आता जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाल्यामुळे प्रत्येक शेतकर्याच्या शेतीला वीज आणि पाणी देण्याचे माझे प्रयत्न असतील. दुष्काळ निवारणावर दरवर्षीच मोठा खर्च होतो मात्र कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी राज्य शासन काम करीत असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
तेली समाजातर्फे आयोजित संत जगनाडे महाराज पुण्यतिथी व सत्कार सोहळ्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना महाजन बोलत होते. व्यासपीठावर आर.टी. चौधरी, भुसावळचे माजी प्र.नगराध्यक्ष अनिल चौधरी, जि.प. सदस्य नामदेव तेली, उपनगराध्यक्ष उत्तम पवार, महेंद्र बाविस्कर आदी उपस्थित होते.
विजेवर उपायासाठी सोलरपंप
राज्यभरात विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे. वीज, पाणी शेतकर्यांच्या मुख्य गरजा आहे. याच दृष्टिकोनातून विजेच्या समस्येवर मात करण्यासाठी शेतकर्यांना पाच लाख सोलर पंप देण्याचा निर्णय नुकताच मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. एक सोलर पंप पाच लाख रुपयांचा आहे. यात शेतकर्याचे २५ हजार तर शासनाचा पावणेपाच लाख रुपये हिस्सा राहील. यामुळे वाटेल तेव्हा पिकांना पाणी देता येईल. त्याचबरोबर उद्योगांना, ग्राहकांनाही वीज देता येईल, असेही जलसंपदामंत्री महाजन यांनी नमूद केले.
(वार्ताहर)
■ जलसंपदा हे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे खाते असून ते शेतकर्यांशी निगडित आहे. मोठय़ा प्रमाणावर निधी याच खात्यातून खर्च होत असल्याने अजित पवार यांनी पंधरा वर्ष ते आपल्याकडेच ठेवले होते. मात्र राज्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराने या खात्याचा बट्टय़ाबोळ केला आहे. या भ्रष्टाचाराच्या चौकशीची परवानगी दिली गेली आहे. खात्यात खूप अनियमितता आहे. ते भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. शेतकरी हितासाठी कामांना अधिक प्राधान्य दिले जाईल, असेही महाजन म्हणाले.
--------------------------
गावागावात हवामानमापक यंत्रे
ऐनपूर, ता.रावेर : नेहमी येणार्या वादळ, पाऊस, गारपिटीमुळे त्रस्त झालेल्या शेतकरीवर्गाला दिलासा देण्यासाठी गावागावात हवामानमापक यंत्र बसवले जाईल, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.
आतापर्यंत हवामानमापक यंत्र हे प्रत्येक तालुक्याच्या मंडळ असलेल्या ठिकाणी बसविण्यात आले होते.ते यापुढे प्रत्येक गावागावात बसविले जाणार आहे. मंडळाच्या ठिकाणी असलेल्या यंत्रामुळे शासनाला नुकसानीचा अंदाज नेमका ठरवता येत नव्हता. नुकसानीचा योग्य अंदाज बांधण्याकरिता महाराष्ट्रात प्रत्येक गावात हवामानमापक यंत्र बसवले जाणार असल्याने त्या गावात वादळ, गारपीटमुळे किती नुकसान झाले याचा अंदाज कळणार आहे.
यंत्रामुळे मिळणार विम्याची रक्कम
गावात यंत्र बसल्यानंतर शेतकर्यांनी काढलेल्या विम्याची रक्कम तत्काळ मिळण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन-धन योजनेंतर्गत लाभाथर्र्ींचे खाते न उघडणार्या राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी बडतर्फ केले जातील.तसेच जे अधिकारी खाते उघडणार नाही त्यांचीही आपल्याकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन खडसे यांनी केले.
नुकसान भरपाई हेक्टरी दहा हजारावरून २५हजार रुपये करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली
ऐनपूर येथे दिवंगत डिगंबर पाटील यांच्याकडे आले असता शेतकर्यांच्या समस्या समजण्याकरिता त्यांनी शेतकर्यांची सभा घेतली.पं.स. सदस्य नंदू महाजन, अशोक कांडेलकर, राजेंद्र पाटील, प्रगतशील शेतकरी विकास महाजन, कमलेश महाजन, राजू महाजन, सरपंच मुरलीधर पाटील, तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)