जळगाव : मुख्यमंत्र्यांनी २0१२ मध्ये कापूस संशोधन केंद्रासंबंधी केलेली घोषणा हवेत विरली आहे. अगदी तशीच केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केळी संशोधन केंद्रात टिश्यू प्रयोगशाळा उभारण्यासंबंधी केलेली घोषणा दिशाभूल करणारी व पुढे फसवी ठरेल की काय? असा प्रश्न आहे.
सध्या निमखेडी शिवारामध्ये कार्यरत केळी संशोधन केंद्रात २00७ मध्ये टिश्यू प्रयोगशाळा सुरू झाली होती. परंतु वीज आणि मजुरांचा तुटवडा यामुळे हे काम तीन वर्षांपूर्वीच बंद पडले. शासनानेही दुर्लक्ष केले. याचा अर्थ या केंद्रात टिश्यू प्रयोगशाळा आहे, पण ती सुरू राहावी यासाठी प्रयत्न नाहीत. यात आणखी नवीन टिश्यू प्रयोगशाळेची गरज काय? असा प्रश्न आहे. यामुळे भाजपाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्र्यांकडून मंजूर करून आणलेली प्रयोगशाळा किती लाभाची व उपयोगाची राहील? हा मुद्दा आहे.
कर्मचारी, संशोधक केले कमी
केळी संशोधन केंद्रात पहारेकरीपासून वरिष्ठांपर्यंत १४ अधिकारी, कर्मचार्यांची पदे मंजूर होती. पैकी सात पदे कमी केली असून, येत्या १ ऑगस्टपासून हा निर्णय लागू होईल. कमी केलेल्या पदांमध्ये कनिष्ठ उद्यानविद्यावेत्ता, कनिष्ठ किटकशास्त्रज्ञ, वरिष्ठ संशोधन सहायक, दोन कृषी सहायक आणि दोन पहारेकरी या पदांचा समावेश आहे. यामुळे या केंद्रातील संशोधनाचे काम किती वेगात व प्रभावीपणे होईल हादेखील प्रश्न आहे.
आघाडीचे अनुकरण?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तत्कालीन आमदार मनीष जैन यांनी घेतलेल्या कापूस परिषदेनिमित्त आले होते. त्यांनी जिल्ह्यात स्वतंत्र कापूस संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. अजूनही हे संशोधन केंद्र सुरू झालेले नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत तेलबिया संशोधन केंद्राचा भाग म्हणून कापूस पैदासकार हे पद पूर्वीप्रमाणेच कायम आहे. या केंद्रात कृषीविद्यावेत्ता, किडरोगशास्त्रज्ञ व वनस्पती विद्याशास्त्रज्ञ ही पदे अजूनही मंजूर नाहीत.
कापूस संशोधनात भरीव काम शक्यच नाही
यामुळे कापूस संशोधनासंबंधीचे कोणतेही भरीव काम सुरू होऊ शकलेले नाही. पूर्वी प्रमाणे फक्त जाती विकसित करण्याचे कार्य सुरू आहे. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांची घोषणा ही हवेतच विरली. याचेच अनुकरण आता भाजपाची मंडळी करीत आहे, हा नवा मुद्दाही पुढे आला आहे.
-------------
जिल्हाभरात कापूस उत्पादकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्यासाठी टेक्सटाईल पार्कची घोषणा मुख्यमत्र्यांनी केली होती. ही घोषणादेखील फक्त घोषणाच राहिली आहे. १0 हेक्टर क्षेत्र
केळी संशोधन केंद्राकडे प्रयोग करण्यासह संशोधनाच्या कार्यासाठी १0 हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्रात शेतकर्यांना टिश्यूची रोपे वितरित करण्यासाठी सक्षम अशी भव्य आणि अधिक क्षमतेची प्रयोगशाळा उभारणे किती शक्य आहे? हा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.
■ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणाबाजी, श्रेय लाटण्याचा हा प्रकार सुरू केला आहे, असा आरोप होऊलागला आहे.
■ केळी उत्पादकांचा कळवळा आहे तर २00८ ते आतापर्यंत १४ वेळेस वादळाचा तडाखा बसलेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाईद्या, अशी मागणीदेखील आहे.