नंदुरबार : बाजार समितीत सध्या नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. भाव मात्र किमान ३०० ते जास्तीत जास्त ७०० रुपये क्विंटल भाव मिळत आहे. भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. सध्या नवीन कांदा काढणीचे काम ग्रामीण भागात सुरू आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील शनिमांडळ, आष्टे, आसाणे, सैताणे या भागात तसेच लगतच्या साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेतले जाते. काही शेतकरी स्थानिक बाजारपेठेत कांदा विक्री करतात तर काही जण इंदूर, अहमदाबाद, दिल्लीच्या बाजारपेठेत ट्रक भरून कांदा विक्रीसाठी नेतात. सध्या निवडणुकीचे वातावरण आणि त्यातून निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्थेच्या भितीमुळे शेतकरी बाहेरच्या बाजारपेठेत कांदा विक्रीसाठी नेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नंदुरबारच्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीस येत आहे. दररोज किमान दोन ते अडीच हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. आणखी आवक वाढण्याची शक्यता असली तरी भावही वाढणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या प्रतवारीनुसार किमान साडेतीनशे ते सातशे रुपयांपर्यंत भाव आहे. किरकोळ विक्रीत मात्र भाव १० ते १५ रुपये किलोने विक्री होत आहे.
नवा कांदा बाजारात दाखल
By admin | Updated: May 19, 2014 01:56 IST