जळगाव : येत्या वर्षभरात ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेपासून जिल्हा बॅकेपर्यंत विविध स्थानिक निवडणुका येत्या वर्षात आहेत. या संस्थांवर शिवसेनेची सत्ता आणायची असेल तर पक्ष संघटन मजबूत करावे लागेल, सत्ता ही संघटनेवर अवलंबून असल्याने जिल्हाभरात शिवसेनेचे ४ लाख सदस्य नोंदविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा, असे आवाहन पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले.
शुक्रवारी अजिंठा विश्रामगृहावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेची संघटनात्मक जिल्हा बैठक झाली. यावेळी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, गोपाळ चौधरी,रावसाहेब पाटील, पद्मसिंग पाटील, सभापती मुकुंद नन्नवरे, नंदलाल पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार नाही, त्या ठिकाणीही विजयाचे उद्दिष्ट ठेवा
गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेत आपली सदस्य संख्या १५ पेक्षा अधिक नाही. ज्या ठिकाणी आमदार आहेत, तेथेच हे सदस्य निवडून येतात. त्यामुळे यापुढच्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात आपले आमदार नाहीत, अशी ठिकाणी उद्दीष्ट ठेवून काम करावे लागणार आहे.
विधान परिषद निवडणुकीत विजयामुळे महाविकास आघाडीची ताकत दिसून आली आहे. भाजपला थोपविण्यासाठी स्थानिक निवडणुकीत देखील हे प्रयोग केले जाणार आहेत. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी शेतकऱ्यांच्या डीपी दुरूस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली. आमदार चिमणराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या पॅटर्नमुळे येत्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी किमान ४० जागा आपण जिंकू शकतो असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी प्रास्ताविकात पक्षसंघटनेची स्थिती आणि आगामी निवडणुकीतील संधी याबाबत सांगत सभासद नोंदणीचा कार्यक्रम नियोजन सांगितले
शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफार्मर येण्यास उशीर होत आहे. त्यामुळे ट्रान्सफार्म दुरूस्ती आणि ऑईलसाठी जिल्हा नियोजन समितीतून नावीण्यपूर्ण योजनेतून लागणारा ६० लाखाचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. सूत्रसंचलन व प्रास्ताविक विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी केले. तर महानगर प्रमुख शरद तायडे यांनी आभार मानले.