एका बाजूला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. वीकेंडला सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात यावा, असा आदेश असताना त्या आदेशाची अंमलबजावणी पारोळा बाजारपेठेत होताना दिसत नाही. उलट सर्वाधिक गर्दी ही शनिवारी व रविवारी बाजारपेठेत पाहण्यास मिळत असते. त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यासाठी पथक नेमणे गरजेचे आहे; पण बाजारपेठेत पथक नेमले जाते. ते प्लास्टिकवर कारवाईसाठी. कारवाईचे स्वागत होत आहे; पण नियमांची पायमल्ली करणाऱ्या दुकानदारांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२२ रोजी या पथकाने प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर करणाऱ्या दुकानदारांवर केलेल्या कारवाईचे स्वागत केले जात आहे; पण कोरोनाचे निर्बंध नियम मोडणाऱ्यावरही अशीच कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पथकात कार्यालयीन अधीक्षिका संघमित्रा सिद्धार्थ सदांशीव, लेखापाल राहुल सावळे, एच. एम. पाटील, चंद्रकांत महाजन, रवींद्र महाजन, भूषण महाजन, किरण कंडारे, निर्भय मोरे, आकाश कंडारे उपस्थित होते.