कुंदन पाटील■ जळगाव
ऐन निवडणुकीच्या प्रारंभी राज्यातील सत्ताधारी आघाडी आणि विरोधातील 'महा'युतीचा काडीमोड झाला. दुरंगी आणि तिरंगी अपेक्षित वाटणार्या लढतींना 'पंच'रंगीचा मुलामा चढताच जिल्ह्यातील काही आमदारांवर 'अभी नहीं.. कभी नहीं'ची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची एरंडोलला सभा झाली. अहिराणी पट्टय़ातील या सभेने पाचोरा, अमळनेर, चोपडा, जळगाव ग्रामीण आणि जामनेर मतदारसंघाला राजकीय 'टच' दिला आणि राजकीय 'हिट' वाढली. सभेमुळे काहींना बुस्टर डोस मिळाला, तर काहींच्या राजकारणाला अँलर्जी झाली. एरंडोलचे चिमणराव पाटील शिवसेनेचे. राष्ट्रवादीचे डॉ.सतीश पाटील यांच्यासोबत त्यांची लढत वाटत होती. मात्र मच्छिंद्र पाटील यांना काल मोदींनी राजकीय मॉलिश केली आणि त्यांना आखाड्यात धाडले. या तेलावरून आमदारकी निसटू द्यायची नाही म्हणून चिमणराव पाटीलही डाव टाकतील. मोदींच्या सभेने 'तिरंगी'चा डाव टाकलाच, हे नाकारता येणार नाही.
जळगाव ग्रामीणमध्ये मोदींची सभा भाजपा उमेदवार पी.सी.पाटील यांना व्हिटॅमिनयुक्त ठरेल. शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना या व्हिटॅमिनची अँलर्जी झालीच, तर राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांसाठी 'गुडलक'. मात्र तिथेही काँग्रेस उमेदवारामुळे देवकरांचे 'देव' पाण्यात आहेत. अमळनेरमध्ये आमदार साहेबराव पाटीलच काय तर सर्वच पक्षांचे उमेदवार 'दादा' आहेत. भाजपाचे अनिल पाटील, काँग्रेसचे गिरीश पाटील आणि अपक्ष शिरीष चौधरी हे सर्व जण 'दादा'च. या दादांच्या भानगडीत 'मोदी कार्ड'चा इफेक्ट किती होतो, हे लवकरच कळेल. पाचोर्यात खरी लढत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ आणि शिवसेनेचे किशोर पाटील यांच्यात आहे. भाजपाच्या उत्तमराव महाजन यांना मोदींची सभा 'उत्तम' बळ देणारी ठरली, तर काहींचे गणित बिघडेल आणि काहींची 'सोय' होईल. काँग्रेसनेही राष्ट्रवादीमागचा 'हात' काढला आहे, हेही विसरता येणार नाही. जामनेरमध्ये गिरीश महाजन यांना मोदींची सभा बळ देणारी असली, तरी कालचा मित्रपक्ष शिवसेना आणि शत्रूपक्ष राष्ट्रवादी परिपूर्ण कसरतीनंतर उभा ठाकला आहे. त्यातच मनसेसह सेना उमेदवार सुभाष तंवर नावाचा 'वंजारा-बंजारा कार्ड'चा भलामोठा 'ब्रेकर' आहे.