लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहर महापालिकेच्या पावतीवर पोलीस दलाचे कर्मचारी दंड आकारत आहेत. त्यामुळे या पावत्या बेकायदेशीर असल्याची तक्रार कांचननगरमधील रहिवासी शैलेंद्र काशिनाथ सपकाळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.
सपकाळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शासनाने सकाळी ७ ते ११ या वेळेत नागरिकांना कामासाठी बाहेर पडण्याची मुभा दिली आहे. असे असले तरी २१ मे रोजी सपकाळे हे सकाळी साडेसात वाजता कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यात त्यांना पोलिसांनी अडवून दोनशे रुपयांचा दंड ठोठावला. सपकाळे यांनी आपल्या घरातील काम आणि कशासाठी बाहेर पडलो हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील त्यांचे कोणतेही म्हणणे न ऐकता पोलिसांनी त्यांना दंड ठोठावला. मात्र त्यासाठी त्यांना महापालिकेच्या नावाची पावती देण्यात आली. पोलिसांनी दंड ठोठावला मग पावती मनपाची कशी, यावरून सपकाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच या अर्जाची चौकशी योग्य प्रकारे न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारादेखील सपकाळे यांनी दिला आहे. या तक्रारीची प्रत सपकाळे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडेदेखील दिली आहे.