हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथील शेतकरी भागवत कडू पाटील यांच्या मालकीचे गट नंबर ४५९ शेतातील कापूस पीक अज्ञात इसमाने कापून फेकले. भागवत पाटील हे मंगळवारी सकाळी शेतात गेले असता, त्यांना ठिकठिकाणी कापसाची वाढलेली हिरवीगार पिके विळा किंवा बख्खीने कापून शेतात फेकल्याचे निदर्शनास आले, तर काही ठिकाणी कापसाची झाडे उपटून नुकसान केल्याचे आढळून आले.
अगोदरच पाऊस येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच त्याच्या शेतातील उभे कापूस पीक कापल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
यासंदर्भात संबंधितांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न व्हावे. संदर्भात त्यांचे लहान भाऊ पुंडलिक कडू पाटील यांनी मुक्ताईनगर पोलिसात तक्रार नोंदवली आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.