धुळे : शहरातील उद्यानांच्या दुरावस्थेवर ‘लोकमत’ने सुरू केलेल्या जागर सदराचे पडसाद महापालिकेच्या आज झालेल्या महासभेत उमटले. सदस्य नरेंद्र परदेशी व संजय गुजराथी यांनी प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारला. त्याची दखल घेत महापौर जयश्री अहिरराव यांनी शहरातील उद्यानांच्या विकासाचे आदेश दिले. शहरातील उद्यानांच्या स्थितीवर ‘लोकमत’ने जागर सादरच्या माध्यमातून प्रकाश टाकला. या उद्यानातील खेळणी, तेथील विविध सुविधा, कर्मचार्यांच्या उपस्थिती, साफसफाई व स्वच्छतेवर प्रकाश टाकला. तसेच चार वर्षात उद्यानात काम करणार्या कर्मचार्यांसह उद्यानांची देखभालदुरूस्ती, वृक्षारोपणावर सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केल्याची बाब प्रकर्षाने समोर आणली. मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करूनही उद्याने भकास कशी आहेत, असा प्रश्न महासभेत सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला. महासभेत विषय विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी गुरूवारी महासभा झाली. त्यात सदस्य नरेंद्र परदेशी व संजय गुजराथी यांनी उद्यानातील स्थितीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. परदेशी यांनी सांगितले की, शहरातील उद्यानांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. साक्रीरोड परिसरात विद्यावर्धिनी महाविद्यालयामागे तयार केलेल्या श्री छत्रपती शाहु महाराज उद्यानाची स्थिती अतिरिक्त आयुक्त के .व्ही. धनाड यांना दाखविली. ऐवढेच नव्हे तर शहरातील सर्वच उद्यानांची स्थिती दयनिय झाल्याचे ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या सदरातून स्पष्ट झाले आहे. उद्याने ही नागरिकांच्या व मुलांच्या विरंगुळ्याचे महत्त्वाचे ठिकाणे आहेत. त्यामुळे ठोस उपयोजना करण्यात याव्यात. गुजराथी यांनी सांगितले की, कोट्यावधी रुपये खर्च करून उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे. तेथील साहित्याची दुरावस्था झाली आहे. विशेष म्हणजे बाग माळी उद्यानातच राहत नाहीत. त्यांच्या विविध विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्यानांची स्थिती भकास झाली आहे. नगरसेवकांच्या शिफारशींनी बागमाळींच्या बदल्या झाल्या आहेत. याला आळा घालून त्यांची उद्यानाच्याच ठिकाणी नियुक्ती करून देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सोपविण्यात यावी.
शहरातील उद्यानांना येणार विकासाचा बहर
By admin | Updated: May 16, 2014 14:45 IST